ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोषाळकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. राज्यात गुंडांचं राज्य चालू असल्याचं ते म्हणाले आहेत.
“जेव्हा गां** राज्य येतं तेव्हा…”
“गुंडगिरी, झुंडगिरी, माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललाय. कारण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना पाठिशी घालतायत. राज्यात गुंड फोफावलेत. राज्यात गां***चं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं. मी हे बोलतोय. काय हवं ते करा”, असं संजय राऊत म्हणाले.
“घोसाळकरांची आई-मुलगी कुत्र्याचं पिल्लू आहेत का?”
“अभिषेक घोसाळकर काय कुत्र्याचं पिल्लू होतं का? शिवसेनेच्या एका युवा कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या झाली. आरोपी भाजपाशी संबंधित आहे. सर्व पुरावे आहेत. घोसाळकरांची आई, वडील, पत्नी, लहान मुलीचा आक्रोष गृहमंत्री फडणवीसांना विचलित करत नाही का? काय म्हणतो हा? आम्ही काय कुत्र्याचं मेलेलं पिल्लू आहोत का? त्यांची आई, मुलगी कुत्र्याचं पिल्लू आहेत का? कसली भाषा आहे ही?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दळभद्री…”, ठाकरे गटाचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल!
“मला अमित शाहांना विचारायचंय की..”
“काल पुण्यात निखिल वागळेंवर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला. मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते काय कुत्र्याचं पिल्लू आहेत का? सत्तेत बसलेले हे लोक कोण आहेत? अमित शाहांना मी विचारू इच्छितो की हा महाराष्ट्र कुणाच्या हातात आहे? मेलेले कुत्र्याचे पिल्लू आहेत, तर तुम्ही कोण आहात? दिल्लीत जाऊन कुत्र्यासारखं शेपूट हलवता आणि इथे येऊन आमच्यावर भुंकताय? पाहून घेऊ, सरकारं बदलतील”, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
“मुख्यमंत्र्यांचा व त्यांच्या मुलाचा मी रोज एक फोटो पोस्ट करतोय. सर्व गुंड, खूनाचे आरोपी, माफिया यांच्यासोबत मुख्यमंत्री सेल्फी घेतात. हे आपल्या राज्याचं चरित्र बनलंय. गुंडांचं राज्य गुंड चालवत आहेत”, असंही राऊत म्हणाले.