सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता' असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानात 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. 'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले', असा उल्लेख या पुस्तकात आहे. संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे. या वादासंदर्भात या पुस्तकाच्या प्रकाशिका संध्या लाखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकलेला नाही.