कराड : पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाची जोरधार ओसरली आहे. मात्र, तरीही ढगाळ वातावरणात सतत कोसळणाऱ्या या नुकसानकारक पावसामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथे सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून, जवळपास सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात वळीव कोसळतच आहे.
पश्चिम घाटात आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सात या ११ तासांच्या कालावधीत दाजीपुराला सर्वाधिक ७२ मिमी, तर खालोखाल हसणे येथे ६२, पाथारपुंजाला ५१, वारणा धरण व सांडवली येथे ४९, शिरढोण येथे ४३ मिलिमीटर असा जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम घाटात अपवादवगळता सर्वच मंडलांत पाऊस झाला आहे.
जोरदार वारे, विजांच्या कडकडासह गेल्या पाच- सहा दिवसांतील तुफान पावसाने जनजीवनाची पुरती दैना उडवली. त्यात भाजीपाल्याची नासाडी झाली आहे. उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, कलिंगड, काकडी, आंबा, मका, बाजरी यासह कडधान्याचे नुकसान झाले आहे. कच्च्या मातीची घरे, झाडे कोसळणे, घरे, पोल्ट्री शेड, दुकानांचे पत्रे उडून जाणे, सखल भागातील घरे व तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरणे, फळांची झड होणे, धान्य भिजणे, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहने जागीच बंद पडणे, तासन् तास वाहतूक ठप्प राहणे, कमकुवत जाहिरातफलक, विद्युत खांब वाकणे, वीज पुरवठा वरचेवर खंडित होणे यांसारख्या गंभीर समस्यांनी लोकांना सतावले.
पुणे- बंगळुरू महामार्ग जागोजागी जलमय झाल्याने वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशा एक ना अनेक घटनांनी सर्वदूर प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सून हंगामासाठी प्रशासनाचा आराखडा तयार होण्यापूर्वीच वळीव पावसाने ही दाणादाण उडवून दिली आहे. उन्हाळी सोयाबीन, घेवडा, भुईमूग काढणी, तसेच खरीपपूर्व मशागतीची कामे सुरू असताना, वळवाचा तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
छोटी धरणे, बंधारे, नद्या, ओढे-नाले, तलाव, विहिरी आदी जलस्रोत कोरडेठाक पडून असल्याने मान्सूनपूर्व पावसाने लोकांना आग ओकत असलेला उष्मा आणि भीषण जलटंचाईत दिलासा मिळाला आहे. मात्र, सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडात भयभीत करणाऱ्या विजा कोसळताना, काही कालावधीसाठी कोसळणाऱ्या बेसुमार पावसाने नुकसानीचा तडाखा दिला आहे.