कोपरगाव : मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात भरधाव कंटेनरने सहा आसनी रिक्षाला  दिलेल्या जोरदार धडकेने झालेल्या भीषण अपघातात सात जण मृत्युमुखी पडले. सात जण गंभीर जखमी आहेत. ही दुर्घटना तालुक्यातील कोपरगाव मार्गावर पगारेवस्तीनजीक सकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातात या रिक्षाचा चुराडा झाला असून, दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी, दोन महिला, दोन पुरुष व एका मुलीचा मृत्यू झाला.

झगडे फाटय़ावरून सहा आसनी रिक्षा घेऊन कोपरगावकडे जात असताना तिला पगारे वस्तीजवळ औरंगाबादहून कोपरगावमार्गे मुंबईकडे लोखंडी गज घेऊन चाललेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. भरधाव असलेल्या कंटेनरने मोटारसायकलवरील तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात हा अपघात झाल्याचे समजते, कंटेनरचालक पळून जात असताना त्याला झगडे फाटय़नजीक नागरिकांनी पकडले. त्याचे नाव दर्शनसिंग गजनसिंग (वय ४१) असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रिक्षातील चार, तर मोटारसायकलवरील तीन असे एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षात एकूण बारा जण बसले होते. ध्रुव सागर राठोड ( १५), कृष्णाबाई गोविंद चौधरी ( ४२), सर्वेश दिगंबर चौधरी (१२), विलास साहेबराव खरात ( ३०), कावेरी विलास खरात (वय ५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले आहे.

मृतांची नावे..

राजाबाई साहेबराव खरात (वय ६०), आत्माराम जमानसा नाकोडे ( ६५), पूजा नानासाहेब गायकवाड (२०), प्रगती मधुकर होन (२०), शैला शिवाजी खरात (४२), शिवाजी मारुती खरात (५२), रुपाली सागर राठोड (१०) अशी मृतांची नावे आहेत.