Sharad Pawar in Massajog Viilage Beed statement on Santosh Deshmukh murder case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र राज्य हादरलं आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्राचं विधीमंडळ व संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत तर, खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्यायाची मागणी केली. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके व आमदार संदीप क्षीरसागर यांना घेऊन मस्साजोग गावात दाखल झाले. पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत आमचे शिलेदार स्वस्थ बसणार नाहीत असंही सांगितलं.

शरद पवार म्हणाले, “निलेश लंके व बजरंग सोनावणे यांनी बीडचं प्रकरण संसदेत मांडलं. ते पाहून या देशात, या राज्यात काय चाललंय असा प्रश्न देशभरातील प्रसारमाध्यमं विचारू लागले आहेत. तुमचं दुःख जिथे मांडायला हवं तिथे तुमच्या लोकप्रतिनिधींनी मांडलं आहे. आता सरकारने याच्या खोलात जायला हवं. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्या मुसक्या आवळायला हव्यात. हल्लेखोर व त्याचा कोणाशी संवाद चालू होता ही सगळी माहिती बाहेर काढली पाहिजे. वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे. लोकसभेत खासदार बजरंग सोनावणे व खासदार निलेश लंके यांनी जे काम केलं तेच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केलं. आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण विधानसभेत मांडलं. ते कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या मतदारसंघातील आहेत, याचा विचार न करता क्षीरसागर व आव्हाड यांनी विधानसभेत हा विषय मांडला. त्यांनी एक गोष्ट प्रामुख्याने मांडली ती म्हणजे या मागचा सूत्रधार कोण आहे ते सर्वांसमोर आणण्याची मागणी या लोकप्रतिनिधींनी केली आहे”.

शरद पवार मस्साजोगच्या ग्रामस्थांना म्हणाले, “मी तुम्हाला एवढंच सांगेन राज्यात एक प्रकारे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून तुम्ही बाहेर पडा. याला आपण सगळ्यांनी मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी समुदायिक प्रयत्न करण्याची भूमिका घेतल्यानंतर आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, “बीड जिल्ह्यात जे काही घडलं ते कोणालाही न पटणारं आणि सहन न होणारं आहे. ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेली १५ वर्षे इथल्या लोकांसाठी भरपूर काम केलं आहे. त्यांनी लोकसेवेचे काम केल्यामुळेच लोकांनी १५ वर्षे त्यांची निवड केली. तो तरुण सरपंच येथील लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समरूप होणारा होता. वादविवादापासून दूर राहणारा होता. असा हा तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता. परंतु, येथील कोणाला तरी दमदाटी झाली आणि त्या प्रकरणी चौकशी करत असताना चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. हा हल्ला शेवटी त्यांच्या हत्येपर्यंत जातो हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. राज्य सरकारला व केंद्र सरकारला याची नोंद घ्यावीच लागेल”.