केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली होती. शरद पवार यांनी दगा-फटक्याचं राजकारण केलं. उद्धव ठाकरेंनीही दगा फटका केला. पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना धडा शिकवला या आशयाचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. त्यांच्या टीकेचा शरद पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हणही त्यांनी वापरली.

काय म्हणाले होते अमित शाह?

“महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.” अशी टीका अमित शाह यांनी केली होती. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह यांचा उल्लेख ते गृहस्थ असा करत उत्तर दिलं.

हेही वाचा- Sanjay Raut on Amit Shah:”उद्धव ठाकरेंना दगाबाज…”; अमित शाहांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

१९७८ च्या सरकारबाबत त्या गृहस्थांनी थोडीफार माहिती घ्यायला हवी होती-शरद पवार

“देशाच्या गृहमंत्र्यांनी शिर्डीत भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शाह यांनी माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शाह नक्की कुठे माहीत नाही. १९७८ मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू आडवाणी असे जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते” असा टोला शरद पवार यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे…

“अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची नावं घेता येतील. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात भूकंप, अतिवृष्टी या संकटांमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी आपात्कालीन स्थितीत काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी माझं नाव आपात्कालीन स्थितीत काय करता येईल याबाबत शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं सुचवलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षाचा असताना मंत्र्याचा दर्जा देऊन मला ते काम सोपवलं होतं. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहीत नसावं. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे उल्लेख झाले त्याबाबत एक मराठीत म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवते” असं म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.