लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण वाढू लागलं आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकताच एक व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) पोस्ट करण्यात आला असून त्यात अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाला लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा खोचक शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे.

शरद पवार गटाची खोचक पोस्ट!

शरद पवार गटानं गुरुवारी सकाळी केलेल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन मांडलिकत्व पत्करणाऱ्या राजांवर टिप्पणी करण्यात आली आहे. “मांडलिक होऊन गुलामी की आपल्या मातीसाठी संघर्ष?
आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जिथे तुमच्यात शिवचरित्र किती झिरपलं याचा कस लागतो. तेव्हा कच खाल्ली, मांडलिकत्व स्वीकारलं, धाकदपटशाहीला बळी पडलात तर मात्र अशांना हा लढवय्या महाराष्ट्र माफ करत नाही”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमोल कोल्हेंच्या आवाजातील व्हिडीओ

दरम्यान, या पोस्टसह शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची महानता सांगताना मांडलिकत्व पत्करलेल्या राजांचाही उल्लेख करताना दिसत आहेत. “मिर्झाराजे जयसिंग, राजा मानसिंग यांचा इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही. कारण ते मांडलिक होते”, असा उल्लेख या व्हिडीओमध्ये आहे.

“…म्हणून आपण आजही छत्रपतींचं नाव घेतो”

“छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात उभे होते, तेव्हा त्याला वाटत होतं की छत्रपतींनी दख्खनची सुभेदारी घ्यावी. दख्खनचा सुभा स्वराज्याच्या आकारमानाच्या तीनपट होता. त्या तुलनेने तेवढी संपत्ती होती. स्वराज्य दऱ्याखोऱ्यांचं राज्य. पण पण दख्खनचा सुभा म्हणजे मुबलक सुपीक प्रदेश. त्याला मुगल सल्तनीच्या शहजाद्याचा मान-सन्मान होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा करून त्याचं मांडलिकत्व घेण्याऐवजी आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी ताठ मानेनं संघर्षाची वाट निवडली. म्हणूनच साडेतीनशे वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो”, असंही या व्हिडीओत म्हटलं आहे.

“कोश्यारींचे एक पुतणे तेव्हा राजभवनात सर्व व्यवहार…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप; अंबानींचा केला उल्लेख!

व्हिडीओच्या शेवटी खोचक टिप्पणी

या व्हिडीओच्या शेवटी खोचक शब्दांत टिप्पणी करण्यात आली असून त्यात अमित शाह यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “शिवचरित्र फक्त मिरवण्यापेक्षा अंगी जिरवलं तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही. धाकदपट’शहांची’ भीती वाटत नाही”, असं व्हिडीओच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या मजकुरात म्हटलं आहे.