कथित किर्तनकार अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या आंदोलनामागे असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. परंतु, बारसकर आणि वानखेडेंचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस आहेत असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठाविरोधी आहेत. ते मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच फडणवीस मला विष देऊन अथवा इतर मार्गांनी ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर सत्ताधारी पक्षांमधील काही नेत्यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (२७ फेब्रुवारी) मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या पाठिंब्यानेच हे सगळं करत असल्याचे आरोप करत असताना भाजपाने शरद पवार आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणखी एक दावा केला आहे. भाजपा नेते आशिष देशमुख यांनी दावा केला आहे की, “ शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गट प्रयत्न करेल. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल. हे ही वाचा >> “मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…” भाजपाच्या या आरोपांना शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज जरांगे यांना बीडमधून उमेदवारी देणार आहे का? यावर शरद पवार म्हणाले, "आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का? हा दावा कोणी केलाय?" या प्रश्नावर सर्वांनी आशिष देशमुख असं उत्तर दिलं. देशमुखांचं नाव ऐकून पवार म्हणाले, हे खूप मर्यादित लोक आहेत. त्यांच्यबाद्दल काय बोलायचं.