काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. हा संपूर्ण तपास नव्याने व्हावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली व त्यास पाठिंबा मिळू लागताच केंद्राने इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. भुकेल्या लांडग्याने भक्ष्यावर झडप घालावी तशी राज्याच्या अधिकारावर झडप घालण्याची गरज नव्हती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता आला असता असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे.

प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार व स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी त्यामुळे अस्थिरतेस आमंत्रण देते. ‘एनआयए’ने महाराष्ट्रात झडप घातली. अशी अनेक प्रकरणे भाजपशासित राज्यांत घडत आहेत. तेथे केंद्राचा हस्तक्षेप का नाही? महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘रात्रीची’ सेवा बजावली. राजभवनाचा वापर केला, पण तेथेही काही झाले नाही. आता एल्गारप्रकरणी रात्रीच गृहमंत्रालयाने ‘एनआयए’ला महाराष्ट्रात पाठवले. हे लक्षण बरे नाही. रात्रीच्या अंधारात पाय ठेचाळू नयेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखात पाप करू नका. काय असेल ते उजेडात करा. समझनेवालों को इशारा काफी है! असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
संपूर्ण देश त्यांना भाजपमय करायचा होता. सुरुवात चांगली झाली होती, पण आता चित्र आणि हिंदुस्थानी नकाशाचा रंग बदलून गेला आहे. लोकशाहीवर कितीही खुनी हल्ले झाले तरी त्याच लोकशाही मार्गाने राज्याराज्यांतून त्यांची सरकारे लोकांनी उलथवून टाकली आहेत. केंद्रात मोदी-शहांचे राज्य नक्कीच आहे, पण महाराष्ट्रासह प्रमुख राज्ये त्यांच्या हातात राहिलेली नाहीत. त्याची वेदना आम्ही समजू शकतो, पण म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप घडवून राज्यांवर दबाव टाकण्याचे तंत्र योग्य नाही. मात्र केंद्राचे सरकार अशा खुनशी पद्धतीने वागत आहे खरे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण म्हणजेच ‘एल्गार’ परिषद गुन्हय़ाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय घेतला आहे व त्यादृष्टीने या तपासावर एका रात्रीत ‘झडप’ घालण्याचा प्रयत्न धक्कादायक नाही, तर संशयास्पद आहे. भीमा-कोरेगाव दंगल हे एक राजकीय आणि राष्ट्रीय षड्यंत्र होतेच. त्यामागे देशविघातक शक्ती असू शकतात.

आपल्या सत्तेस सुरुंग लावला जाईल या भीतीची टांगती तलवार सगळय़ाच सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर असते व त्यातून उलटसुलट कारवाया सुरू असतात. भीमा-कोरेगाव प्रकरणात तसेच झाले असावे. या प्रकरणात विचारवंत, बुद्धिवादी समजणारे काही ‘डाव्या’ विचारसरणीचे लोक पकडले गेले आहेत. ही सर्व मंडळी लेखक, कवी, वक्ते आहेत. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत व त्यांच्याच प्रेरणेने भीमा-कोरेगाव प्रकरण घडले व त्यामागे पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा हात आहे असे नंतर जाहीर झाले. मात्र एल्गार परिषद आणि नंतर उसळलेली दंगल, हिंसाचार हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत.

केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी हा तपास ‘एनआयए’कडे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? शनिवारवाडय़ासमोरच्या एल्गार परिषदेत काही बाहेरच्या लोकांनी भडकावू भाषणे केली. ही भाषणे करणारे लोक भाजपच्या भाषेत ‘तुकडे तुकडे गँग’चे सदस्य होते हे मान्य केले तरी या तुकडे तुकडे गँगपेक्षा भयंकर विखारी भाषणे सध्या भाजपचे नेते, मंत्री करू लागले आहेत. आंदोलन करणाऱयांना, सत्य बोलणाऱयांना गोळय़ा घाला, देशाबाहेर फेकून द्या, अशी उन्मत्त भाषा मंत्रीपदावरील व्यक्ती करीत आहेत. अर्थात हा त्यांचा राष्ट्रभक्तीचा ‘एल्गार’ ठरतो व त्यामागे एखादे षड्यंत्र आहे का याचा तपास व्हावा असे कुणास वाटत नाही.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘रात्रीची’ सेवा बजावली. राजभवनाचा वापर केला, पण तेथेही काही झाले नाही. आता एल्गारप्रकरणी रात्रीच गृहमंत्रालयाने ‘एनआयए’ला महाराष्ट्रात पाठवले. हे लक्षण बरे नाही. रात्रीच्या अंधारात पाय ठेचाळू नयेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखात पाप करू नका. काय असेल ते उजेडात करा.