Sanjay Raut on Raj Thackeray-Fadnavis Meeting: बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा धुव्वा उडाला. यानंतर आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे आता राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी यावर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “माध्यमांनाच या भेटीची चिंता लागली आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटण्यासाठी गेले असतील आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या. राज ठाकरे आणि फडणवीस याआधीही अनेकदा भेटले आहेत.”

दरम्यान राज ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यात ते या भेटीचे कारण विशद करतील, अशी शक्यता आहे.

हा राजकीय अपराध…

“राज्यातले दोन प्रमुख नेते भेटत आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा होत असेल तर त्यांनीच भेट घेण्याचे कारण सांगितले पाहिजे. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता, ते स्वतःच याबद्दल परखडपणे आणि स्पष्ट बोलतील”, असेही संजय राऊत म्हणाले.

“राज ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटणे हा राजकीय अपराध होत नाही. माझे किंवा उद्धव ठाकरेंचे काही सामाजिक काम असेल तर आम्हीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. राज्याचा मुख्यमंत्री एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

त्यामुळे कदाचित भेट घेतली असेल…

संजय राऊत पुढे म्हणाले, “लवकरच गणेशोत्सव येत आहे. कदाचित राज ठाकरे गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यासंदर्भातले काही प्रश्न मांडायला गेले असतील. फडणवीस यांच्या राज्यात दोन दिवसांपासून मुंबई बुडत आहे. नाशिक, ठाणे सारखी शहरे बुडाली. त्यामुळे राज्याच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी काही चर्चा केली असेल. आम्हाला या बद्दल त्रास होत नाही.”

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दारूण पराभव

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. यात ठाकरे बंधूंच्या पॅनेलच्या सर्वच्या सर्व २१ उमेदवारांचा पराभव झाला. या निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ही एका पतपेढीची निवडणूक होती. ती महानगरपालिका किंवा तत्सम मोठी निवडणूक नव्हती. या निवडणुकीतील मतदार कोण, हेदेखील आम्हाला माहीत नाही. स्थानिक पातळीवर लढल्या गेलेल्या निवणुकीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

अजित पवार या भेटीबद्दल म्हणाले…

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला अनेकजण जात असतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणे, ही आपली परंपरा आहे. त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे काहीच कारण नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.