Aditya Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामधून राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा दिला आहे. “राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या या पत्रानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे. ते परभरणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही…”; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र, दिला ‘हा’ इशारा! मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून काही ठिकाणी कारवाई केली होती. यासंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून हे पत्र ट्वीट केलं आहे. राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे? “मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असं या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत. “मला प्रश्न पडलाय की…” “गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहाता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे. “मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत”, असं देखील या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे. https://twitter.com/RajThackeray/status/1523984598405095425?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1523984598405095425%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmns-raj-thackeray-open-letter-to-cm-uddhav-thackeray-on-loudspeaker-pmw-88-2922434%2F आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारलं असता त्यांनी टोला लगावला. "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक मुद्दे असताना त्यावर कोणीही बोलत नाही," असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोला असा सल्लादेखील दिला. "मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात, देशात अनेक महत्वाचे विषय आहेत. महागाईचा वाढता दर पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणं बाकी आहे. त्यासाठी पत्र लिहिलं तर बरं होईल," असं आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्येला आम्ही दर्शनासाठी जात आहोत, राजकारणासाठी नाही असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं. बेराजगारी, महागाई यावर कोणी बोलत नसून ५० वर्षांपूर्वी काय झालं वैगेरे यावर चर्चा सुरु असून राजकारण केलं जात असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. मनसे कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा राज ठाकरेंच्या आरोपावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आपलं कर्तव्य पार पडत असून राज ठाकरेंनी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अटक करण्यासाठी मदत केली पाहिजे असं ते म्हणाले आहेत. फडणवीसांचा राज ठाकरेंना सल्ला दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारकडून जास्त अपेक्षा करु नयेत असं सल्ला दिला आहे. "हनुमान चालिसा म्हटल्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाकणाऱ्या सरकारकडून त्यांनी जास्त अपेक्षा करु नये. आम्ही त्यांच्याविरोधात लढत असून, राज ठाकरेंनीही लढलं पाहिजे," असं ते म्हणाले आहेत.