राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र, भेटीनंतर छगन भुजबळांनी याबाबत प्रतिक्रिया देत आपली ही राजकीय भेट नसून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर असल्याचं सांगितलं. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. आता छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीवर शिवसेना शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. “छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar) हा महाराष्ट्रात सकारात्मक सिग्नल आहे”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“छगन भुजबळ यांनी जी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात एक सकारात्मक मेसेज गेला. मागच्यावेळीही मराठा आरक्षणाबाबत जी बैठक झाली होती. तेव्हा शरद पवार स्वत: उपस्थित होते. त्यानंतर आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी घेतलेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणातील सकारात्मक गोष्ट आहे. राज्य सरकारचीही हीच भूमिका आहे. कोणत्याही समाजामध्ये भांडण लागता कामा नये. मग त्यामध्ये ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज असो. कोणत्याही समाजाने आपआपसात भांडण करणं ही महाराष्ट्राती संस्कृती नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा; भुजबळ म्हणाले, “राज्यातील…”
“मराठा आणि ओबीसींच्या (Maratha Reservation) मागण्याबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे. मराठा आणि ओबीसींच्या मागण्यासंदर्भात सरकार कायम अलर्ट आहे. अधिवेशनाच्या काळातही महायुती सरकारने आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आले नव्हते. ज्यांनी या बैठकीसाठी यायला हवं होतं आणि चर्चा घडायला हवी होती. पण ती चर्चा घडली गेली नाही. ही वस्तुस्थिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन छगन भुजबळ आज शरद पवार यांना भेटले आहेत. शरद पवार यांनीही दोन दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं आहे”, असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या आरक्षणाच्या प्रश्नांबाबत पुढाकार घेत आहेत. आता मराठा समाजाच्या लाखो कुणबी नोंदी निघाल्या. मात्र, दरवेळी मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम केलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मान्य केलं की जवळपास ४७ लाखांच्या आसपास कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मात्र, ही उपलब्धी सरकारने केली आहे. याआधी कोणीही ही हिंमत केली नव्हती. आता मराठा आणि ओबीसींच्या मागण्याबाबत सरकार म्हणून आम्ही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करुन यातून चांगला मार्ग कसा निघेल, यासाठी सरकार निश्चितच सर्वांसाठी रेड कार्पेट टाकून स्वागत करेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.