राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला समाधान हवं आहे, आणि पालखीचं ओझं वाहायचं असेल तर जाऊ शकता अशा शब्दांत पक्षांतर करणाऱ्यांना सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“असा कोणाताही विरोधी पक्षातील नेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला आहे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाही आहे, ज्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षात जात आहात? अशी फोडाफोडी झाल्यानंतर वापरा आणि फेकून द्या ही निती सर्वांनी वापरल्याची अनेक उदाहरणं आहेत. हे आपल्याकडचं राजकारण आहे. हा एक संदेश आहे की, दुसऱ्या पक्षाने आपला वापर करुन फेकून देऊ द्यायचं की आपण आपल्या पक्षात ठामपणे काम करायचं,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

“एखादी व्यक्ती किंवा नेता आपल्यावर अन्याय करत असेल तर त्या पक्षाचा त्याग करुन दुसऱ्याची पालखी वाहणार आहात का? तुम्ही पालखीत बसणार आहात का? तुम्हाला पालखीत बसवण्यास कोणी तयार आहे का? मी कोणाच्याही उज्ज्वल भविष्याआड येऊ शकत नाही, येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल तर नक्की जा. पण पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला समाधान हवं आहे का? पालखीचं ओझं वाहायचं असेल तर जाऊ शकता,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “किती असे पक्षांतर केलेले नेते आहेत जे दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले आहेत. एका ठराविक काळानंतर त्यांची कारकिर्द संपते,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut interview maharashtra cm uddhav thackeray operation lotus in maharashtra sgy
First published on: 26-07-2020 at 09:40 IST