मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेच शपथविधी झाले असून इतर मंत्रीपदांची वाटणी आणि त्यांचे शपथविधी प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारला आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. "फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही" महाराष्ट्रात पावसाचं थैमान असताना राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. "महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेलाय. १०० च्या आसपास लोक महाराष्ट्रात वाहून गेल्यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याच्या अनेक भागात कॉलराचं थैमान आहे. रुग्णालयांत गोंधळ आहे. अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं होत नाही. शपथ घेऊन १२ दिवस होऊन गेले. पण सरकार स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. तिथे गेलेले अनेक आमदार अपात्र ठरू शकतात", असं संजय राऊत आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. पाहा व्हिडीओ - "..म्हणून शपथविधी लांबणीवर" "अपात्रतेची तलवार डोक्यावर असणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ देणं हा राजद्रोह आहे. याची भिती असल्यामुळे त्यांना शपथ देण्यापासून रोखलं गेलं आहे. राज्यपालांनी अशा प्रकारचं कोणतंही घटनाविरोधी कृत्य करू नये, असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना पाठवलं आहे. आत्तापर्यंत घटनेचं पालन केलेलं नाही, आता तरी करा. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मत्रीमंडळ अस्तित्वात नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. महापूर आहे. कॉलऱ्याचं थैमान आहे. कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करणारे राज्यपाल कुठे आहेत? आता तुमच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज आहे", असं देखील राऊत यावेळी म्हणाले. काँग्रेसची शिवसेनेविरोधात शिंदे-फडणवीसांकडे तक्रार! ‘ही’ कृती ठरवली अनैतिक, तातडीने पावलं उचलण्याची मागणी! "..त्यामागे राजकीय विचार नाही" भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेनेवर टीका केली जात आहे. मात्र, आदिवासी समाजातील प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे कोणताही राजकीयच विचार नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.