विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांना व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं असून काही खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर आरोप होत असून प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईवरुनही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. संजय राऊत यांनी पत्रात एका महिन्यापूर्वी काही लोक महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याकडे आले होते. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न होता असा दावा केला आहे. मात्र आपण त्यांना मदत केली नसल्याने आपल्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

“महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी संपर्क”

“एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझी भेट घेत राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत मागितली होती. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यासाठी मदत करावी असा त्यांचा हेतू होता. मी नकार दिला अता मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी देण्यात आली. जेलमध्ये राहावं लागलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांप्रमाणे मलाही परिणाम भोगावे लागलील असं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर माझ्यासोबत कॅबिनेटमधील इतर दोन वरिष्ठ मंत्री आणि याशिवाय इतर दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी देण्यात आली. महत्वाचे नेते जेलमध्ये गेल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं त्यांचं म्हणणं होतं,” असं राऊतांनी पत्रात सांगितलं आहे.

“भाजपासोबत युती तुटल्यापासून कारवाई”

“महाराष्ट्रात भाजपासोबत युती तुटल्यापासून आमच्या पक्षाच्या खासदार, नेत्यांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे. आमचे नेते, खासदार यांच्यासहित त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांचाही छळ केला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.

तसंच ज्या पीएमएलए कायद्यांतर्गत ईडी कारवाई करत आहे, तो कायदाच २००३ मध्ये आला आहे. तसं असतानाही २००३ च्या आधीची प्रकरणंही बाहेर काढली जात असून हे योग्य नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चौकशी”

तसंच मुलीच्या लग्नाच्या खर्चासंबंधी चौकशी केली जात असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. “माझ्या मुलीचं २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं. ईडी आणि इतर तपास यंत्रणा डेकोरेटर तसंच इतर कंत्राटांना समन्स बजावत असून धमकावत आहेत. माझ्याकडून ५० लाख रोख मिळाले असा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा छळ केला जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“जमीन व्यवहारात अडकवण्याचा प्रयत्न”

संजय राऊत यांनी यावेळी अलिबागमध्ये आपण १७ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारावरुन संबंधितांना धमकावत खोटी माहिती देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.

“ईडीने बेकायदेशीरपणे २८ जणांना घेतलं ताब्यात”

“ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी आतापर्यंत बेकायदेशीरपणे २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. यांनी ईडीच्या कार्यालयात बोलावून धमकावलं जात आहे. या सर्वांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं असून तासनतास बसवलं जात आहे. जर माझ्याविरोधात जबाब दिला नाही तर घऱी जाऊ देणार नाही आणि अटक करु इथपर्यंत धमकावलं जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी तर काही जणांकडे त्यांच्या वरिष्ठांनी माझ्याविरोधात रचलेला कट असल्याचं मान्य केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी यापुढेही आपण सभागृहात आणि सभागृहाबाहेर बोलत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut writes letter to rajya sabha chairman m venkaiah naidu ed maharashtra government sgy
First published on: 09-02-2022 at 08:47 IST