एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातलं वातावरण सध्या तापलं आहे. शासनात विलिनीकरण या मागणीव्यतिरिक्त राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पगारवाढ, वेतनहमी या बाबींची तजवीज केली आहे. मात्र, त्यानंतरही काही कामगार संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता कामावर रुजू न होणाऱ्या कामगारांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही काही कामगार संपाबाबत आग्रही आहेत. त्यामुळे यावरून वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून एसटी कर्मचाऱ्यांचे पुढारी, भाजपा आणि सदाभाऊ खोत-गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "कुठे माघार घ्यायची, हे कळते तोच नेता" एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी नेतेमंडळींना शिवसेनेनं लक्ष्य केलं आहे. "गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन पुढाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीचे स्वागत करून संपातून माघार घेतली. भरघोस वेतनवाढ हेच संपकऱयांचे मोठे यश आहे, पण संप सुरू करतानाच कधी व कुठे माघार घ्यायची, हे ज्यास कळते तोच कामगार नेता. कामगारांचा पुरता विध्वंस झाला तरी चालेल, कामगारांच्या संसाराच्या होळ्यांवर आपली चूल पेटविणारे पुढारी या संपातही दिसत आहेत. एखाद्याने अंगावर काळा कोट चढविला व राज्यकर्त्यांवर असभ्य, एकेरी भाषेत हल्ला केला म्हणून आपणच नेते या भ्रमात जे लोक आहेत, त्यांनी कामगारांना संकटाच्या खाईत ढकलू नये", असं अग्रलेखात म्हटलं आहे. "…यातून राजकीय खाज शमेल इतकंच!" दरम्यान, राज्य सरकारवर टीका करणाऱ्या कामगारांच्या नेत्यांवर शिवसेनेनं निशाणा साधला आहे. "पडळकर, खोत यांनी आग लावली, पण आता ती त्यांना विझविता येत नाही. हे आंदोलकांच्या नेतृत्वाचे अपयश आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय खाज शमेल इतकेच! संप हे भरघोस पगारवाढीसाठीच होत असतात. सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच कामगारांचे रक्षण करोत. अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?" "…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात" गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. "खोत व पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपकऱ्यांत घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात. तरीही हे शहाणपण महत्त्वाचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीलाच समंजसपणाची भूमिका घेतली असती, तर एस.टी. कर्मचाऱ्यांचे असे हाल झाले नसते", अशा शब्दांत भाजपालाही लक्ष्य करण्यात आले आहे.