अहिल्यानगर : शहर व परिसरात काल, बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या वादळी पावसाने २० झाडे उन्मळून पडली. १५-२० विजेचे खांब उखडले गेले. परिणामी १६ तासांहून अधिक काळ शहराच्या बहुतांश भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागांतील आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू होते.

शहराला काल सायंकाळी सातनंतर वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आज, गुरुवारी दिवसभर महापालिकेच्या आपत्ती निवारण पथकाने रस्त्यावर पडलेली झाडे, फांद्या, पालापाचोळा व इतर कचरा गोळा करण्याचे काम सुरू केले होते.

वादळामुळे वाडिया पार्क, महावीर कलादालन, वैभव हॉटेल, कानडे मळा, बोल्हेगावातील कातोरे वस्ती, मुकुंदनगर, भिस्तबाग चौक, पंकज कॉलनी, नवलेनगर, रेल्वेस्थानक आदी भागांतील झाडे उन्मळली. काही ठिकाणी वाहतूकही बंद पडली. मनपा आयुक्तांचे व उपजिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान येथेही झाडे पडली. काही ठिकाणी झाडे वाहनांवर पडल्याने नुकसानही झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील किमान १५-२० विजेचे खांब पडले. याचा फटका नगर शहरासह श्रीगोंद्यातील मांडवगण, कोळगाव फिडरलाही बसला. रात्रभर पावसात महावितरणचे सुमारे १०० कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात गुंतले होते. काही भागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सूर्यनगर, तपोवन रस्ता परिसरातील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरू झालेला नव्हता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.