सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील मळवाडी रस्त्यावर काही युवकांना एका पाणवठ्यावर चक्क पट्टेरी वाघ पाणी पिताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, पश्चिम घाटातील वाढत्या जैवविविधतेचा हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली-चौकुळ मार्गावरून जात असताना युवकांना चौकुळ मळवाडी येथील नदीमध्ये पट्टेरी वाघ विश्रांती घेताना आणि पाणी पिताना दिसला. गाडीतील युवकांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली, मात्र चाहूल लागताच वाघाने नजिकच्या जंगल भागात धूम ठोकली.

यापूर्वीही चौकुळ परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याचे स्थानिक सांगतात, त्यामुळे या भागातील वाघांचे सातत्यपूर्ण अस्तित्व स्पष्ट झाले आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांची संख्या वाढत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी याच पट्ट्यात दाभिळ येथील एका विहिरीत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू झाला होता, तर खडपडे परिसरातही वाघ दिसला होता. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा समृद्ध जैवविविधतेचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दिवसा वाघ दिसल्याने भीतीचे वातावरण:

एकीकडे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले असले तरी, दिवसाढवळ्या वाघ दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेती किंवा इतर कामांसाठी बाहेर पडताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तीपीठ महामार्गामुळे जैवविविधतेवर प्रश्नचिन्ह?

या सकारात्मक वातावरणातही ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पावरून चिंता व्यक्त केली जात आहे. आंबोली, चौकुळ, फणसवडे यांसारख्या व्याघ्र कॉरिडॉर असलेल्या पट्ट्यातून शक्तीपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. यापैकी काही गावे तर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात, याबाबत न्यायालयानेही आदेश दिले असून भारत सरकारने अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत या महामार्गामुळे पश्चिम घाटातील या अनमोल जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. चौकुळमध्ये दिसलेला वाघ हा पश्चिम घाटातील वाढत्या वन्यजीव संख्येचा एक आरसा आहे. या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आणि विकास प्रकल्पांचे नियोजन करताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.