पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. तर, काँग्रेसला अवघं एकच राज्य बळकावता आलं. या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमी फायनल होती, असं राजकीय तज्ज्ञ सांगत होते. त्यामुळे या निकालांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाला चांगली संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, फायनलला आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्या, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळ्यात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, यशाला अनेक भागीदार असतात, पण अपयश एकटंच असं म्हणतात. आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठं अपयश मागच्याच आठवड्यात आलेलं आहे. लांब तोंड करून आम्ही दुःखी आहोत. एकमेकांवर आरोप होत आहेत. पण झालं तर आहेच ना. आता त्यात किती आपण रमत बसणार? एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे. सेमिस्टरला नापास झालो म्हणून फायनलला नापास होऊ असं काही नसतं. अभ्यास नीट केला तर फर्स्टक्लासमध्येही पास होऊ, काही सांगता येणार नाही.

“आता चार राज्य हरलो. म्हणून त्यातच रमत बसायचं नाही. आता कपडे झटकून पुन्हा कामाला लागायचं. लोकसभा निवडणुकीसाठी सहाच महिने उरले आहेत. या सहा महिन्यातही सगळं चांगलंच होणार आहे”, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझा सध्या सर्वाधिक वेळ फोकस कामातून इतर कामात जातो. माझा वकिलांशी कधी संबंध आला नव्हता. मराठी माणसाच्या संस्कार असतात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ते इतक्या वेळा बिंबवलेलं असतं. त्यामुळे मी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढले तेव्हा मला माझी आज्जीच दिसली. पण आता मी पायरी चढले, आता माझ्याकडे उतरण्याचा मार्गच नाही. पण या गोष्टी होत असतात”, असा अनुभवही सुप्रिया सुळेंनी यावेळी शेअर केला.