नारायण राणेंबाबत मात्र मौन

राज्यातील सत्तेत असलेली शिवसेना ही नेहमी सत्तेतून बाहेर पडतो असे धमकावत असते. सेनेची ही धमकी म्हणजे एक जोकच आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर, नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता सुळे यांनी मौन बाळगले. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या वेळी पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या की , राज्यातील शिवसेना नेहमीच काही ना काही कारणावरून भांडत असते. आमचे मंत्री खिशात राजीनामे घेवून फिरत आहेत. आणि आता तर काय म्हणे सत्तेतून बाहेर पडू. असे म्हणणे म्हणजे एक जोकच आहे अशी खोचक टीका खा. सुळे यांनी केली. तसेच राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या संकेतामुळे शिवसेना काडीमोड करेल, असे स्पष्ट सांगता येणार नाही. कारण राणे साहेबानी यापूर्वीही संकेत दिले होते. मात्र त्यांची स्वतची आयडॉलॉजी आहे, असे म्हणत खा. सुळे यांनी या विषयी बोलणे टाळले.

खा. सुळे यांनी या वेळी राज्य सरकारळा लक्ष्य करीत सध्या भाजपा सरकार हे केवळ भाषणे करून मार्केटिंग करीत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांस न्याय मिळत नाही, असे सांगितले. सध्या पेट्रोल,डीझेलच्या दरवाढी बाबत विचारले असता खा. सुळे यांनी भाजपची खिल्ली उडवली. पूर्वी इंधन दरवाढ झाली की एक मावशी येत होती. आता मी ती मावशी शोधत आहे,असे त्या म्हणल्या. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराबाबत सध्या दोन समाजामधे अंतर आहे. वेगवेगळ्या नावासाठी मोच्रे निघत आहेत. यामधून सरकारचे मिसमॅनेजमेंट दिसून येत असून सरकार या प्रकरणी पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे त्या या वेळी म्हणाल्या.

अन्यथा पंढरपूर ते मुंबई आंदोलन

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे, ही मागणी आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यी फास्टट्रॅक वर खटला चालविणार होते. मात्र वष्रे उलटूनही कोपर्डीचा खटला सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि येत्या तीन महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढावे. अन्यथा, पंढरपुरातूनच मुंबईपर्यत जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.