राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये ताळमेळ नाही आणि यामुळेच जनतेचं नुकसान होत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या 'टू द पॉईंट' या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सगळे नेते आपापल्या भूमिका मांडताना दिसतात. जर सगळेजण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलत असतील तर मग बैठकीत हे लोक काय बोलतात. त्या बैठकीमधील यांचे वाद बाहेर का येतायत? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात एकसुत्रता होती. ही ताळमेळ महायुतीच्या सरकारमध्ये दिसत नाही. आम्ही तिन्ही पक्ष एक टीम होतो. परंतु, आता तसं चित्र दिसत नाही. यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे मी म्हणते या सरकाला पॉलिसी पॅरालिसीस हा आजार आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे तिन्ही पक्ष काम करण्यासाठी एकत्र आलेले नाहीत. २०० आमदार असलेल्या या सरकारला जर दररोज विरोधकांवर टीका करावी लागत असेल. यांच्यात एकवाक्यता नसेल तर हे लोक कारभार कसा पाहणार? खरंतर राज्यात ते (महायुती) विरुद्ध आम्ही (मविआ) असा सामना नाही. शिंदे गट विरुद्ध भाजपा, विरुद्ध अजित पवार गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकींमधून ज्या गोष्टी बाहेर येतात त्यावरून हेच वाटतं की यांच्यात मेळ नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हे लोक बाहेर येऊन काय-काय बोलतात ते ऐका. त्यावरून सहज समजतं की, त्यांच्यात मतभेद आहेत. कॅबिनेटमध्ये मतभेद असले, बैठकीत जरी काही वाद झाले तरी ते चार भिंतीत राहिले पाहिजेत. परंतु, यांचे वाद चव्हाट्यावर येतात. प्रत्येक मंत्री जर बाहेर येऊन बोलत असेल, दुर्दैवाने छगन भुजबळांसारख्या नेत्याला कॅबिनेट बैठकीतून बाहेर पड्यानंतर आरक्षणाबद्दल बोलावं लागत असेल, त्यांचा मुद्दा प्रसारमाध्यमांसमोर मांडावा लागत असेल तर हे दुर्दैवी आहे. हे ही वाचा >> आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार? उच्च न्यायालयाच्या नोटिशीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले… राष्ट्रवादीच्या खासदार म्हणाल्या, मला कधी कधी वाटतं की संजय राऊत जे बोलतात ते बरोबर आहे. त्यांचं बोलणं महायुतीवाल्यांना लागतं. परंतु, ते खरं आहे. मलाही ठामपणे वाटू लागलं आहे की खरंच त्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर आहे. त्यांच्यात ताळमेळ नाही. प्रत्येकजण कॅबिनेटबाहेर येऊन हवं ते बोलतो. मग मला प्रश्न पडतो की, हे लोक कॅबिनेटमध्ये कसली चर्चा करत असतील. सगळ्यांनाच बाहेर येऊन माध्यमांसमोर बोलावं लागतंय, मग हे लोक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय करतात?