दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला खडे बोल सुनावले.

“कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही.”, असं प्रत्युत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आशिष शेलारांना दिलं आहे.

“राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?” मुंबई दहशतवादी अटक प्रकरणी भाजपाचा संतप्त सवाल!

“आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केलं जातं. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे.”, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. “यामध्ये अपयश आहे असं मी म्हणणार नाही. यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. एटीएसचं या घटनेवर लक्ष आहे. पोलिसांना पोलिसांच्या् पद्धतीने तपास करू दिला पाहीजे. त्यातून सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल., असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पाकिस्तानचा डाव उधळला: अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगमध्ये ISI चा सहभाग उघड

दरम्यान, भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली होती. या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासलं जात आहे.