स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भातील समस्यांवर बोलताना अमरावतीत एक वादग्रस्त विधान केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळेत मदत मिळाली नाही तर १२ नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा देतानाच तुपकर यांनी थेट महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची चिथावणी दिलीय. परतीच्या पावसाने तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तरी देखील सरकारने शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत केली नाही. त्यामुळे मी आता विदर्भ व मराठवाडाचा दौरा करतोय. जर १२ नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर केंद्र व राज्य सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच तीव्र आंदोलन करु. १२ नोव्हेंबरनंतर राज्यभरामध्ये हे आंदोलन उभारु असा इशारा यांनी दिलाय. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुपकर यांनी, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे, त्यामुळे या रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापले तर महावितरण कार्यालय जाळण्यात सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असं म्हटलं आहे. तसेच, "विनंती करून देखील वीज कनेक्शन कापले तर वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा व वेळ पडली तर फोन करा," असं वादग्रस्त वक्तव्य तुपकर यांनी केले.