राज्यात दूध भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवली जात असतानाही भेसळीचे वाढते प्रमाण रोखण्यात यंत्रणांना यश मिळालेले नाही. दुसरीकडे दुग्धविकास विभागाच्या भरारी पथकांच्या तपासणीत दूध संस्था आणि केंद्रामध्ये देखील दुधाचा दर्जा खालावल्याचे चित्र दिसून आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये दुग्धविकास विभागाच्या भरारी पथकांनी राज्यातील १ हजार ७४२ दूध संस्था आणि केंद्रांमधील दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली तेव्हा ३६ हजार ५३ हजार लिटर दुधाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले, तर ७ हजार ४६१ लिटर दुधाच्या चवीत अनियमितता आढळून आली.
दुग्धविकास विभागाच्या ताज्या अहवालानुसार या कालावधीत सुमारे १८ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. दुधात पाणी मिसळणे हा प्रकार सर्रास असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये बेकायदेशीररीत्या बनवलेले रासायनिक दूध, दुधात वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि अयोग्य पदार्थ मिसळण्याचे प्रकार वाढले आहेत. सुटय़ा दुधामध्ये भेसळीची शक्यता जास्त असते. मात्र दूध केंद्रांमध्ये भेसळ होण्याची शक्यता कमी असल्याच्या समजाला छेद देणाऱ्या अनेक बाबी उघड होत आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने गेल्या वर्षी केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात सुमारे ६८ टक्केदूध भेसळयुक्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते. राज्यात १२६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा ग्रामीण भागातील ४९ नमुन्यांमध्ये आणि शहरी भागातील ३३ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. भेसळीचे हे प्रमाण ६५ टक्के आहे.
राज्यात दुधातील पाण्याच्या भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून दूध भेसळ प्रतिबंधक राज्यव्यापी मोहीम सुरू केली. अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक ठिकाणी छापे टाकले जातात. दंडात्मक कारवाई होते, पण नंतर ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते, अशी ओरड आहे. दुधात पिण्यास अयोग्य पाणी मिसळल्यानंतर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पण त्यावर अंकुश ठेवण्यात अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. दुधात ग्लुकोज किंवा स्कीम्ड दूध पावडर मिसळण्याचे प्रकार तर सहजासहजी निदर्शनासदेखील येत नाहीत. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी सर्वसामान्यांकडे कोणतीही साधने नाहीत. तक्रार कोठे करावी किंवा तक्रार केल्यानंतर न्याय मिळेल का, असे प्रश्न नागरिकांना भेडसावत असतात. त्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला आहे.
राज्यात दररोज १ कोटी ९० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, दुधाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. मात्र तरीही मागणी आणि पुरवठय़ात तफावत आहे. झटपट कमाईसाठी दुधात भेसळ करणे दूध व्यापाऱ्यांसाठी सामान्य बाब ठरू लागली आहे, पण त्यातच आता दूध संस्था आणि दूध केंद्रांमध्येही दुधात भेसळ करण्याचे उद्योग वाढले आहेत. दुग्ध विकास विभागाच्या भरारी पथकांनी गेल्या आठ महिन्यांमध्ये १७ लाख लिटर दुधाची तपासणी केली, त्यात त्यांना १६ लाख ६४ हजार लिटर दूध चांगले दिसले.
६० हजार लिटर दुधात भेसळ असल्याचे निदर्शनास आले. राज्यातील दूध संस्था आणि केंद्रामधील दुधाची तपासणी एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात करणे दुग्धविकास विभागाला शक्य नसले, तरी पथकांची संख्या वाढवण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.
बाजारातील दुधाची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची यंत्रणा उपलब्ध असली, तरी तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच ही यंत्रणा कामाला लागते, असा अनुभव आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
राज्यात दुधाचा दर्जा खालावला
राज्यात दूध भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवली जात असतानाही भेसळीचे वाढते प्रमाण रोखण्यात यंत्रणांना यश मिळालेले नाही.

First published on: 17-09-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The milk quality in maharashtra fall down