ज्ञानेश भुरे

पुणे : तिरंदाज घडविण्यासाठी साताऱ्यातील ‘दृष्टी तिरंदाजी अकादमी’ला आता अधिक सुसज्ज अशा मैदानाची नितांत गरज आहे. तिरंदाजीसाठी रेंज उपलब्ध असल्या, तरी अकादमीला पक्के मैदान, व्यायामशाळा आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांसाठी क्रीडा प्रेमींच्याच नाही तर समाजातील सर्वाच्या विश्वासाची, भक्कम आधाराची आवश्यकता आहे.

तिरंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी सध्याच्या जागेचा जास्तीतजास्त सदुपयोग ‘दृष्टी’ अकादमी करून घेत आहे. अकादमीचे मैदान म्हणजे ऊसशेतीची जमीन आहे. पाऊस पडल्यावर तिरंदाजांना अक्षरश: चिखलात उभे राहून सराव करावा लागतो. सरावासाठी हिरवळीचा पृष्ठभाग लागतो. मात्र, एकूण खर्च भागवताना ओढाताण होत असल्याने हिरवळीचे मैदान विकसित करणे आणि त्यानंतरचा त्याचा देखभाल खर्च करणे अकादमीच्या आवाक्याबाहेर आहे.

हेही वाचा >>>“पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

अकादमीत सध्या ४० मुले प्रशिक्षण घेत आहेत. अकादमीतून अनेक होतकरू तिरंदाज घडल्यामुळे केवळ साताऱ्यातूनच नाही, तर अन्य शहरांमधूनही अनेक तिरंदाज प्रशिक्षणासाठी येत आहेत. याच संस्थेची जगज्जेती ठरलेली आदिती स्वामी साताऱ्यातलीच असली तरी दुसरा जगज्जेता ओजस देवताळे नागपुरातून खास प्रशिक्षणासाठी या अकादमीत दाखल आहे. संस्थेत बाहेरून आलेली सध्या १७ मुले आहेत. निवासाची चांगली सुविधा उपलब्ध झाल्यास खेळाडूही मोकळेपणाने येथे राहू शकतील, प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे त्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था करण्याचा अकादमीचा मानस आहे.

अकादमीने आतापर्यंत तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारातील खेळाडू घडवले आहेत. ऑलिम्पिक प्रकार असलेल्या रिकव्र्ह प्रकाराचे प्रशिक्षणही प्रवीण सावंत देतात. पण, तिरंदाजांसाठी रिकव्र्ह प्रकारातील तज्ज्ञ प्रशिक्षक नियुक्त करण्याचा विचार प्रवीण सावंत करीत आहेत. अर्थात, या प्रशिक्षकांचे मानधन परवडणारे नसल्यामुळे त्यांचा निर्णय लांबणीवर पडत आहे.

हेही वाचा >>>हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळाडू म्हणून कारकीर्द घडवताना तंदुरुस्तीलाही विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे अकादमीत योगासन केंद्र आणि आधुनिक व्यायामशाळा उभारण्याचा प्रवीण सावंत यांचा मानस आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचा विचार अकादमीचे व्यवस्थापन मंडळ करत आहे. जागतिक तिरंदाज घडवणाऱ्या या संस्थेने सोडलेले सर्व संकल्प तडीस नेण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.