पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आलं आहे. एवढच नाहीतर हातात असलेल्या पंजाब सारख्या राज्याची सत्ता देखील गमावली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्व बदलाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काल काँग्रेसची कार्यकारी समितीची बैठक देखील सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकीकडे या घडामोडी घडलेल्या असताना दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचं बोललं जात आहे, शिवाय महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. असं असताना आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. या अगोदर देखील अनेकदा नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी देखील स्थानिक निवडणुकात काँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपाने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे - तर, “केंद्रात सत्तेचा दुरूपयोग करून भाजपाने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे. काँग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे हीच मोदी सरकारची सूडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कट कारस्थान रचण्यात येते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने नेहमीच खटाटोप करून पाहिला आहे. परंतु काही केले तरी हे सरकार कोसळत नाही. म्हणून खोटे आरोप करून रान पेटवायचे काम भाजपाने सुरू केले आहे. सामान्य जनताही भाजपाला ओळखून आहे,” असे नाना पटोले यांनी काल सोलापुरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे.