अकोले : तालुक्यातील राजुर गावात सुरू असलेली काविळीची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. तिचा फैलाव वाढत असतानाच या साथीने आज, शनिवारी दुसऱ्या रुग्णाचा बळी घेतला. मिसबाह इलियास शेख या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गाव भयभीत झाले आहे. आतापर्यंत कावीळग्रस्त रुग्णांची संख्या ३५० च्या वर पोहोचली आहे.
आज या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव पिचड यांनी तालुका आरोग्याधिकारी श्यामकांत शेटे, गटविकास अधिकारी अमर माने, सहायक गटविकास अधिकारी मुठे, विस्तार अधिकारी श्री. गायकवाड यांच्यासमवेत तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता योग्य ती उपाययोजना करून गावातील आरोग्याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना देऊन यात हलगर्जीपणा झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.
राजुरमध्ये कावीळसारखी साथ पसरून दोन निष्पाप जीव गेले, तरी प्रशासन जागे होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वेळेत पावले उचलली असती, तर हे जीव वाचू शकले असते. आता गावाच्या आरोग्यावर गदा येणाऱ्या प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी लागेल, असे पिचड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
पिचड यांनी मृत्यू पावलेल्या मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसमवेत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्वच्छता, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटींकडे लक्ष वेधले.
उपसरपंच संतोष बनसोडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. दरम्यान, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची पुणे येथून आलेल्या शास्त्रज्ञांचे पथक आज राजुरमध्ये दाखल झाले. या टीममध्ये डॉ. शिल्पा तोमर, डॉ. जावडेकर, डॉ. नारायण वायबसे, डॉ. नागोजी चव्हाण आणि डॉ. कुणाल पिसे यांचा समावेश आहे. या तज्ज्ञांनी गावातील पाणी व सांडपाण्याचे नमुने घेतले असून, विषाणू संसर्गाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनीही गावात भेट देऊन आरोग्य केंद्र, जलस्रोत आणि बाधित भागांची सविस्तर पाहणी केली.
‘एनआयव्ही’चे पथक लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार असून, त्यानुसार पुढील उपाययोजना राबवली जाणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने वैद्यकीय शिबिरे, जलस्रोताचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहिमा राबवण्याची मागणी केली आहे.