अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद अखेर न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी अलिबागच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या २६ तारखेला होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
  शहाबाज संघर्ष समितीतर्फे अ‍ॅड. असिम सरोदे, अ‍ॅड.प्रवीण ठाकूर व अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर याचिकेचे काम पाहणार आहे. या याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या टी. आर. गलांडे, व्ही. बी. हमणे, ए. ए. कोळी व अलिबागचे तहसीलदार विनोद खिरोळकर यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
  याचिकेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने संघर्ष समितीच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ हे शब्द नसलेले फॉर्म पुरविल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर शेकापच्या उमेदवारांना मात्र ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ हे शब्द सुस्पष्टपणे दिसतील असे फॉर्म पुरविण्यात आल्याच नमूद करण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे सुवर्णा हिराजी पाटील व सुरेखा नरेश म्हात्रे या समितीच्या उमेदवारांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गामध्ये होऊन शेकापचे दोन उमेदवार मात्र ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
शहबाज ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या तीनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद होती, असेही या याचिकेत नमूद करण्यात आल्याचे नरेश म्हात्रे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The panchayat elections sahabaj dispute in court
First published on: 11-07-2013 at 03:36 IST