जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी हे सरकारचं मोठं यश असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सरकारच्या कामगिरीवर नजर टाकताना जलयुक्त शिवार योजनेतून लोकसहभागाची चळवळ उभी राहिली व त्यातून हजारो खेडी जलमय झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात वर्षानुवर्षे दुष्काळी स्थिती असते. तिथे जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाण्याची पातळी चांगली राहिली. शेतीचे उत्पादन वाढले, मोठ्याप्रमाणात जमीन ओलिताखाली आली आहे. मागील सरकारांपेक्षा या योजनेत सिंचनाचे चांगले काम झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच विरोधकांना खोटे बोलण्याची सवयच लागली आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचे यश दिसून येत नाही. जनतेलाच जलयुक्त शिवारचं यश आणि महत्व समजलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांनाही फटकारले. सकारात्मकतेमध्ये बातमी नाही. फक्त नकरात्मक गोष्टीच बातमीचा विषय असतो, असे माध्यमांनी गृहीत धरले आहे. हे चुकीचे आणि वाईट असून माध्यमांनी सकारात्मकतेकडेही लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऑर्गनायजर’शी बोलताना फडणवीस म्हणाले, या योजनेमुळे शेती उत्पादनात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे १६ हजार ५२२ खेड्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली आहे. त्यामुळे २४ लाख टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे. फक्त या योजनेमुळे एकूण ३४ लाख २३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून हे केवळ ७ हजार ७०० कोटी रुपयांमध्ये शक्य झाले आहे. यामध्येही ६३८ कोटी रुपयांचा लोकसहभाग आहे.

याच योजनेअंतर्गत मागील चार वर्षांत मागणीनुसार शेततळे या योजनेतून ३७ हजार ८४६ शेततळे उभारले असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी ३० हजार शेततळ्यांची निर्मिती सुरु आहे.

या सर्व योजनांमुळे ज्या भागात कमी पाऊस असतो तेथील शेती उत्पादनात यंदा १५० टक्क्यांनी वाढ झाली. विशेषत: मराठवाडा विभागात. जलयुक्त शिवारमधील कामांमुळे तेथील शेती उत्पादनात अल्प पावसानंतरही घट झालेली नाही.

विरोधकांवर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही विरोधकांचे धोरणच आहे. ते नेहमी उघडे पडलेत. जलयुक्त शिवार योजना किती यशस्वी ठरली आहे, हे जनतेला माहीत आहे. लोकांन सत्य माहीत आहे. ते बदल पाहत आहेत. बरोबर काय आणि चूक काय, हे त्यांना समजतं. विरोधक सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत आहेत. सोशल मीडियाचा आम्ही नेहमीच सकारात्मक वापर केला आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The success of the jalyukt shivar scheme is the greatest achievement says devendra fadanvis
First published on: 05-11-2018 at 12:40 IST