Sanjay Raut on Amit Shah : “आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालच्या नागपूर दौऱ्यात म्हणाले आहेत. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना पश्चाताप झाला असता, असं संजय राऊत म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

अमित शाहांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून आज संजय राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्या बाबतीत उल्लेख केलाय की त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. मला असं वाटतं आपल्या सत्ताधाऱ्यांनासुद्धा तोच शब्द लागू पडतो. पहलगाममध्ये २६ माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. त्यामुळे सगळ्यात आधी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा. या सर्वाला जबाबदार कोण असेल तर अमित शाह जबाबदार आहेत. गृहखात्याचं काम हे अत्यंत अपयशी आणि बिनडोक पद्धतीचं आहे.”

अख्खी मुंबई बुडाली आणि हे तिकडे राजकारण करत बसलेो

“आधी ४० जवान मारले गेले, त्यानंतर २६ महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्याला जबाबदार कोण? आणि हे आम्हाला अक्कल शिकवतात? अमित शाह आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांकडे जाऊन आमरस पुरी खायला बसले. देशात काय चाललंय? अजून आमच्या २६ माय भगिनींच्या घरातील आक्रोश संपलेला नाही. अख्खी मुंबई काल बुडाली आणि हे तिकडे राजकारण करत आहेत. अमित शाहांचा राजीनामा घ्या. राजीनामा घेण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे. आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता की नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना वाचवलं. कोणाला खुनातून वाचवलं आणि कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं”, असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर पाकिस्तानबरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि ऑपरेशन सिंदूरचं आता राजकारण करत आहेत. नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका. तुमचं काय कर्तृत्व आहे? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत, हा तुमचा राग आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली, त्याकरता बाळासाहेब ठाकरेंनी मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय. महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.