Third DyCM In Maharashtra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून दोन्ही बाजूने सतत आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होत असतात. आता अशात शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे. काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून त्यांनी दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले उद्योगमंत्री दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची भाषा करत असल्याचे म्हणत, त्यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल करा असे म्हटले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मुंबईतील बीकेसी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला विजय हा बाळासाहेबांच्या विचारामुळे झाल्याचे म्हटले होते. आज संजय राऊत यांनी महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचे म्हणत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळणार

आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मी बाळासाहेबांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असे सांगितले जात आहे. पण बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करायला शिकवले नाही. आज जो काही बूट चाटेपणा सुरू आहे. तो बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे हे प्रकरण फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. उद्या तेही राहणार नाही. कारण महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. हा तिसरा मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षातला आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. मी कोणाचेही नाव घेणार नाही. पण पडद्यामागे बरेच काही सुरू आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेत ‘उदय’ होणार होता…

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्याकडे इशारा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच शिवसेनेत ‘उदय’ होणार होता, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले होते. तर वडेट्टीवार यांनीही अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.