संगमनेर : सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर शहरालगतच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. शनिवारी रात्री या टोलनाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतुल कासट यांच्यासह त्यांचे भाऊ आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. त्याचे पडसाद आज उमटले असून संगमनेरकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा >>> Congress : “जर पीएम मोदींना जराही लाज वाटत असेल तर त्यांनी…”; नितेश राणेंच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरून काँग्रेसचा हल्लाबोल

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेरचे माजी नगराध्यक्ष, दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांचा मुलगा अतुल, त्याचे भाऊ आणि त्यांचा मित्र शैलेश वामन हे शनिवारी मध्यरात्रीनंतर संगमनेरकडे येत असताना हिवरगाव पावसा टोल नाक्यावर आले असता वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन्ही वाहनचालकांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद सुरू होता. काही कारण नसताना या वादात अचानक टोल कर्मचार्‍यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करुन चौघांवर हल्ला चढवत गुंडागर्दी केली. या हाणामारीत कासट बंडू व त्यांचे मित्र जबर जखमी झाले. नंतर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल केला गेला.

हेही वाचा >>> Walmik Karad : “वाल्मिक कराड शरण आला, आधी पुण्यात….”; सीआयडी अधिकारी सारंग आव्हाड यांनी काय सांगितलं?

यापूर्वीही टोल कर्मचाऱ्यांकडून दहशत निर्माण करत मारहाणीचे प्रकार अनेकदा घडले आहेत. आताचा प्रकार घडून देखील दोन दिवस उलटले तरी गुन्हेगारांवर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे संतापलेल्या सर्वपक्षीय नागरिकांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

मोर्चात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व विश्वास मुर्तडक, उद्योजक गिरीश मालपाणी, ज्येष्ठ नेते प्रा. एस.झेड. देशमुख, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रकाश राठी, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, दिलीप साळगट, सोमनाथ कानकाटे, आप्पा केसेकर, ओंकार भंडारी, अजित मणियार, ओंकार सोमानी, जावेद जहागीरदार, ज्ञानेश्वर कर्पे, योगेश जाजू यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि संगमनेरकर सहभागी झाले होते. मोर्चाने आलेल्या संगमनेरकरांनी प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांना मागण्याचे निवेदन देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांचा धाक राहिला नाही – आमदार तांबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यंत मितभाषी असलेल्या कासट बंधू व त्यांच्या मित्राला झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. साधारण महिनाभरापूर्वीही असाच प्रकार टोल नाक्यावर घडला होता. त्यावेळी निलंबित करण्यात आलेल्या टोल कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे पत्र पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिले. असे पत्र देण्याचा त्यांना अधिकार आहे काय ? असा सवाल उपस्थित करत शहरात दिवसेंदिवस विविध प्रकारची गुन्हेगारी फोफावत आहे, परंतु पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. घडलेल्या मारहाणीचा आपण निषेध करतो. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्याच दिवशी पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून टोल नाक्यावर चालू असलेली गुंडगिरी संपवण्याबाबतही पोलिसांना आदेश दिले आहेत. झालेला प्रकार दुर्दैवी असून दोषी कोणाचेही कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. पोलीस प्रशासन चुकीचे वागत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.  आमदार अमोल खताळ