वाई : काससारख्या संवेदनशील भागात शासनाने आयोजित केलेल्या कास महोत्सवाकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थांसोबतच पर्यटकांनीही पाठ फिरवली आहे. महोत्सव उद्घाटनाला फक्त खासदार उदयनराजे भोसले सोडले तर या परिसराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामस्थांनीही पाठ फिरवली. उद्घाटक पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही महोत्सवाला वाढता विरोध पाहून मंत्रालयातील बैठकीचे कारण सांगून सहभागी होणे टाळले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे आदी अधिकारी उपस्थित होते. साताऱ्यात कास पठारावरील अटाळी (ता. सातारा) येथे सातारा प्रशासन, वन विभाग व पर्यटन विभागाच्या वतीने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कास पठाराअलिकडे आटाळी गावात अडीचशे छोटी-मोठी झाडे तोडत जागा तयार करण्यात आली. या महोत्सवात बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तर प्रत्यक्ष कार्यक्रमात नृत्य, गाणी, लेझर शोचे आयोजन केले आहे. या वेळी स्पीकरच्या भिंतींनी (डिजे) कास परिसर दणाणून सोडला. दरम्यान संवेदनशील भागात सुरू असलेल्या या महोत्सवाला निसर्गप्रेमींपासून स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. याजोडीने आज पर्यटकांनी देखील या महोत्सवाकडे पाठ फिरवल्याने ऐन उद्घाटनावेळी मंडप रिकामा होता.