हिंगोली : बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या हळदीला पत्र्याचा निवारा आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असे चित्र दिसल्यानंतर हळद विक्रीचे ओटे रिकामे करण्यात आले. हळदीचा लिलाव सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला. आठ दिवसांनंतर हळदीच्या सरासरी दरात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. सोमवारच्या लिलावात हळदीचा किमान दर ११ हजार ५०० ते कमाल दर १३ हजार रुपयांपर्यंत पोहोचला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालास निवारा देण्यात आला आणि शेतकऱ्यांची हळद उघड्यावर होती. परिणामी अवकाळी पावसात शेतकऱ्याचा माल भिजल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शेतकऱ्यांच्या मालास निवारा उपलब्ध करून द्यावा आणि व्यापाऱ्यांची हळद उचलावी, असे सांगण्यात आली.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळद शेतमालाचा लिलाव करण्यासाठी पत्र्याच्या निवाऱ्यात पाच ओटे उपलब्ध आहेत. त्यावर सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल मालाचा लिलाव होतो. परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या पत्र्याच्या निवाऱ्यात आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असे चित्र होते. याच काळात वळिवाच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले. पत्र्याच्या निवाऱ्यातील पाच ओटे रिकामे झाल्यानंतर सोमवारी लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.