नांदेड – पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही आयटीआयचे शिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी नांदेड तालुक्यातील राहटी (बु) शिवारात घटना घडली. शंकर धोंडिबा कदम ( वय १९, रा. अटकळी ता बिलोली) आणि शिवराज सुरेश कदम (वय १९ रा. पुयडवाडी, नांदेड ) असं या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
नांदेड शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. या आयटीआयमध्ये शहरासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. बिलोली तालुक्यातील आटकळी येथील शंकर कदम आणि नांदेड तालुक्यातील पुयडवाडी येथील शिवराज कदम हे दोघे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होते. सोमवारी दुपाऱी सात मित्र राहाटी येथे वर्ग मित्राच्या घरी गेले होते. मित्राची भेट झाल्यावर रहाटी(बु) येथील गोदावरी नदी पात्रात गेले. यातील शंकर कदम व सर्वाणी नदीमध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र शिवराज कदम या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे नदीमध्ये बुडाले. दोघे बुडाल्याचे समजताच इतर मित्रांना धक्का बसला आणि त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मात्र त्यांचा शोध काही लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गोदावरी जिवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केले अथक परिश्रमाने गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत शोध घेऊन दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान या प्रकरणी लिंबगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली.