राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, उद्या होणारी सुनावणी ही परवा म्हणजे २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे. हेही वाचा- “मी अडीच वर्षात मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीच पाहिली नाही”, भाजपा नेत्यांसमोर संजय शिरसाटांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा निवडणूक आयोगाची मुदतही २३ ऑगस्टला संपणार सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. २३ ऑगस्टला याची मुदत संपत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- ‘खरी शिवसेना कुणाची?’ शर्मिला ठाकरेंनी दिले उत्तर, म्हणाल्या… उद्याची सुनावणी परवा सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठापैकी न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार उद्या अनुपस्थित असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी आता परवा होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़. या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत गेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी मांडले होते. त्यामुळे या प्रकरणी घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.