बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावरून दोन्ही राज्यांमधील सरकारांनी वेळोवेळी आपापल्या भूमिका जाहीर केल्या आहेत. मात्र, अद्याप सीमाभागावर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतरही या मुद्द्यावर तोडगा निघालेला नसतानाच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमुळे या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापू लागलं आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदे बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मविआ महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करणार

“मी स्वत: सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जातोय. काल माझं शरद पवारांशी तर आज सकाळी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय. आम्ही ठरवलंय की एकजुटीनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा. यावेळी कधी नव्हे ती महाराष्ट्र एकीकरण समिती एकसंघ आहे. त्यांच्यात फाटाफूट दिसत नाहीये. मला खात्री आहे की यावेळी कर्नाटक विधानसभेत एकीकरण समितीचे आमदार असतील”, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी बोलून दाखवला.

“देवेंद्र फडणवीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता मी…”, संजय राऊतांचं टीकास्र; थेट CBI कडे तक्रार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उगीच खोटे दाखले देऊ नका”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं. “माझं आव्हान आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. ते म्हणतायत ना की त्यांनी बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला, तुरुंगात गेले. ही वेळ आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीच्या प्रचारासाठी बेळगावात यावं. देवेंद्र फडणवीसांनी यायला हवं. जर आपण मराठी मातीचं, मराठी माणसाचं देणं लागत असाल, तुमच्यात खरंच हिंमत असेल, अस्मिता असेल तर शिंदे आणि फडणवीस या दोघांनी पुढच्या आठ दिवसात प्रचारासाठी बेळगावात यायला हवं. नाहीतर त्यांचा एकीकरण समिती आणि बेळगाव सीमाभागाशी संबंध नाही. उगीच खोटे दाखले देऊ नये ते तुरुंगात गेल्याचे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.