अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळ-जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. लटके यांचा मुंबई पालकेतील नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. दुसरीकडे लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपला ‘प्लॅन बी’ तयार ठेवल्याचे म्हटले जात आहे. ऋतुजा लटके यांना उमेदवारी देता आली नाही, तर दुसरा पर्याय कोण यावर उद्धव ठाकरे गटात खल सुरु असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे सविस्तर वृत्ता ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

हेही वाचा >>>> ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातोय? फडणवीसांनी ठेवलं नियमांवर बोट; म्हणाले “सर्वांसाठी…”

या वृत्तानुसार ऋुतुजा लटके या शिंदे गटात गेल्या किंवा त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही, तर उद्धव ठाकरे गटाने प्लॅन बी आखल्याचे म्हटले जात आहे. या योजनेनुसार ऋतुजा लटके निवडणुकीत उतरल्या नाहीत तर अंधेरी पूर्व मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे गट उमेदवारी देऊ शकतो. यामध्ये शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख किंवा एखाद्या गटप्रमुखाला उमेदवारी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

हेही वाचा >>>> अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या हायकोर्टातील याचिकेमुळे वाढलं गूढ; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

ऋतुजा लटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, असे वृत्त येताच त्यांनी खुद्द यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. “तुम्ही माझ्याकडे बघितल्यावर माझ्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर शिंदे गटाचा दबाव नाही. मला शिंदे गटाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची माहिती खोटी आहे. मी त्यांना भेटलेले नाही. आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. माझे पती रमेश लटके त्यांचीही निष्ठा उद्धव ठाकरेंशी आणि बाळासाहेब ठाकरेंशीच होती,” असे ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुंबई पालिका प्रशासनाकडे आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा मंजूर करावा यासाठी त्यांनी नियमानुसार एका महिन्याचे वेतनही पालिका कोषागारात जमा केलेले आहे. मात्र पालिकेने अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. पालिकेच्या या वेळकाढूपणामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुंबई पालिकेने माझा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी न्यायालयात केली आहे. या याचिकेवर उद्या (१३ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.