Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आता तुम्हाला संदेश नाही तर थेट बातमीच देतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर केलं होतं. मात्र त्यांच्यावर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
शिवसेना भाजपाची युती असतानाही युतीच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसबरोबर गेलात ते महाराष्ट्राच्या मनात होतं का? बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली केलीत आणि काँग्रेसला साथ दिलीत हे पण महाराष्ट्राच्या मनात होतं का? राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला होता तेव्हा एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाही म्हणत राज ठाकरेंना बरोबर घेतलं नव्हतं. आता राज ठाकरेंशी हात मिळवणी केल्यावर दोन तलवारी एका म्यानेत कशा राहतील? असा प्रश्न रामदास कदम यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंकडे वैचारिक भूमिका नाही-रामदास कदम
उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांची वैचारिक भूमिका त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या भूमिकेला हरताळ फासण्याचं काम, पायमल्ली करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. काँग्रेससोबत जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली. ते जगाने पाहिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे कधीच बाळासाहेबांचा ब्रँड होऊ शकत नाही. ज्या काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काँग्रेससोबत जाण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असं रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड होऊ शकत नाहीत
कदाचित राज ठाकरेंचा ठाकरे हे ठाकरे ब्रँड होऊ शकतात. उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत. मी जबाबदारीने बोलतो. बाकीचे आमदार गुवाहाटीला गेले होते. तेव्हा गुलाबराव पाटील २० आमदारांना घेऊन मातोश्रीत बसले होते. उद्धवजी अजून तुम्हाला विनंती आहे, आपण काँग्रेससोबत जाऊ नका, अशी विनंती गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केली. हवं तर गुलाबराव पाटलांना विचारा. त्यावर उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना गेट आऊट म्हटलं. गेट आऊट. तुम्हीही चालते व्हा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आपल्या सहकाऱ्यांना अशी भाषा वापरणारा व्यक्ती हा ठाकरे ब्रँड होऊ शकतो का? कदाचित राज आणि उद्धवचं मनोमिलन झालं तरी उद्धव ठाकरे हा ठाकरे ब्रँड होऊच शकत नाही. आम्ही पक्ष मोठा केला. आम्ही जेलमध्ये जात होतो, तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. बाळासाहेबांचा ब्रँड काय आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही, असं कदम म्हणाले. रामदास कदम यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळे त्यांनी हे विधान केलं आहे.