अजित पवार गटातले दत्ता गोर्डे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हातात शिवबंधन बांधलं त्यावेळी पुन्हा एकदा भाजपावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. आपली ताकद वाढते आहे याचा मला आनंद आहे. आपल्याला गद्दारी गाडायची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काय म्हणाले उद्धव ठाकरे? मी मुख्यमंत्री असताना करोना काळ होता, त्यावेळी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही योजना मी राबवली होती. आता देशावर दुसरं संकट आलंय, त्यावेळी मी माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे की नाही? हे मी महाराष्ट्रात जाऊन पाहतो आहे. नुकताच मी कोकण दौरा केला. तिथे कुटुंब संवादाला उत्तम प्रतिसाद मिळाला. निसर्ग आणि तौक्ते ही दोन वादळं कोकणच्या किनारपट्टीवर धडकली होती. मात्र मागच्या चार दिवसात मला कोकणात दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे. काहींच्या मनात अजूनही प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे आहेत? पण लक्षात ठेवा हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकूमशाही उखडून फेकायची असते हाच पहिला पर्याय असतो. आपल्याला तेच करायचं आहे." भाजपाचा ओंगळवाणा कारभार उघडा पडला आहे "मातोश्री असेल किंवा मी जिथे जातोय तिथे, भाजपातले लोक शिवसेनेत येत आहेत. मुस्लीम समाज शिवसेनेबरोबर येतो आहे. तुम्ही सगळेजण सूज्ञ आहात. तुम्हाला दिसतं आहे की जो काही भ्रम निर्माण केला जातो आहे तो खोटा आहे. मन की बात आणि जन की बात ही कुठेही जवळपास येत नाही. त्यांच्या मनातले मांडे वेगळे आहेत. १० वर्षात भाजपाने ओंगळवाणा कारभार केला जो उघडा पडला आहे. गावांमध्ये मोदी सरकारचा रथ अडवत आहात कारण योजनाच पोहचलेल्या नाही. अशा कारभाराला संपवण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर आहात. हे पण वाचा- “ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना…..”; उद्धव ठाकरेंची भाजपावर जहरी टीका हुकूमशाही आपल्याला गाडायची आहे आपण असं नेहमी म्हणतो की संकट काळात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. याही संकटातून महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे. ती दिशा म्हणजे हुकूमशाहीला गाडणे. तुम्ही सगळे पैठणमधून आलेला आहात, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अशा भूमीत गद्दारीला थारा नसतो. रायगड आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात गेलो तसाच मी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहे. सध्या लोक गळपटत आहेत. शरण जात आहेत. नितीशकुमार गेले, आणखी कोणी जातील. जे भेकड आणि लाचार आहेत ते जातील. पण महाराष्ट्रात भेकडांपेक्षा मर्द मावळे कैक पटीने जास्त आहेत हेच तुम्ही दाखवून दिलं आहे."असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.