औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमधील व्हेरॉक इलास्टोमर्स कंपनीमध्ये वेतनवाढीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीतील कामगारांनी गांधीगिरीच्या मार्गाने लढा पुकारला आहे. गेल्या १७ दिवसांपासून अन्नत्याग करून कामगार काळ्या फिती लावत काम करत आहेत. मात्र या आंदोलनाकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे आंदोलन काळात 'बेस्ट' काम केले असे म्हणत कंपनीकडून काही कामगारांना सन्मानित करण्यात आले आहे. व्हेरॉक इलास्टोमर्स प्लांटमध्ये व्हेरॉक आणि स्वामी यांचे शेअर्स होते. स्वामी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केले असून कंपनी त्यांच्या मालकीची होणार आहे. मात्र त्या अगोदरच कामगारांचा करार संपलेला आहे. त्याला बराच काळ लोटला आहे. 'आम्ही व्हेरॉक कंपनीचे कामगार आहोत. त्यामुळे त्यांच्या इतर प्लांटमधील कामगारांप्रमाणे आम्हाला वेतन वाढ मिळावी', अशी कामगारांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी कामगार आयुक्त यांच्याकडेही तक्रार केली आहे. स्वामी यांनी मात्र कामगार दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. 'आम्ही कामगारांना कुटुंबाप्रमाणे वागवतो. अन्नत्याग करुन आंदोलन करत असलेल्या कामगारांचा मागील करार इतर कामगारांप्रमाणेच होता. तेव्हा व्हेरॉकचे ५१ टक्के शेअर्स होते. आता ३० टक्क्यांनुसार करार करायला आम्ही तयार आहोत. कामगार दबाव आणण्याचे काम करत आहेत. जर त्यांनी आंदोलन थांबवले नाही, तर उद्यापासून मीही अन्नत्याग करेन,' असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. मात्र 'आम्ही दुसऱ्या प्लांटमध्ये जाण्यास तयार आहोत. त्यामुळे इतर कामगारांप्रमाणे आम्हाला वेतन दिले जावे,' असे कामगारांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी कामगार आयुक्तांकडे तक्रारदेखील दाखल केली आहे.