हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणारे मात्र वारकरी संप्रदायानुसार जीवन जगणाऱ्या तजुद्दीन शेख यांचे काल औरंगाबादमध्ये निधन झालं. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरजवळ असणाऱ्या जामदा येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किर्तन सुरु असतानाच ताजुद्दीन शेख महाराजांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी घडली. मात्र किर्तनादरम्यानच हृदयविकाराचा झटका आल्याने ताजुद्दीन महाराज मंचावरच खाली बसल्याचा आणि नंतर किर्तनाच्या मंचावरच त्यांनी देह टाकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
वारकरी सांप्रदायामध्ये चार वेदांना फार महत्व आहे. ताजुद्दीन नूर महंमद यांनी याच वेदांचा आणि हिंदू धर्मग्रथांचा अभ्यास केला. अभ्यासानंतर गीता आणि कुरणमध्ये परश्वेवर एकच असल्याचा संदेश देण्यात आल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी जन्माने मुस्लीम असतानाही सच्चिदानंदगिरी महाराज या नावाने गावोगावी जाऊन किर्तनं करण्यास सुरुवात केली. मानवता हाच खरा धर्म असून सर्व जाती धर्मांना समावून घेणारा वारकरी सांप्रदाय हा अधिक जवळचा वाटल्याने आणि आपल्या विचारसणीशी मिळता जुळता असल्याने त्यांनी वारकरी म्हणून किर्तनं करण्यास सुरुवात केली. त्यांनी गावेगावी जाऊन प्रबोधनाचे काम सुरु केलं.
राज्याबाहेरही ताजुद्दीन महाराजांचं नाव प्रसिद्ध झालं. नाथ षष्ठीला ते पैठणची आणि आषाढीला पंढरपूची वारी आवर्जून करायचे. संत वचनांसहीत गीता आणि कुराणचाही फार अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळेच त्यांच्या किर्तनासाठी फार गर्दी व्हायची. हिंदू- मुस्लिमांमध्ये द्वेष हा केवळ भाषेच्या अडचणीमुळे असून त्यामळेच दोन्ही धर्मांमधील दरी रुंदावल्याने महाराज नेहमी सांगायचे. दोन्ही धर्मातील लोकांनी एकमेकांशी भाषणा शिकून गीतेतील श्लोक आणि कुराणमधील हदीस, आयते वाचल्यास त्यांना अर्थबोध होऊन द्वेष नष्ट होईल असा ताजुद्दीन महाराजांचा ठाम विश्वास होता.
आपल्या गावामध्ये एक आश्रम सुरु करुन त्यांनी वारकरी सांप्रदायाचा प्रसार, प्रचार करण्याचं काम केलं. मंगळवारी दुपारी जालना जिल्ह्यातील घनसांगवती तालुक्यातील बोधलापुरी गावामध्ये त्यांच्या आश्रमात साई मंदिरासमोरच्या जागेत त्यांचा दफनविधी करण्यात आला.