Vijay Wadettiwar : मालवणयेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. परिपत्रक जारी करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातदेखील पैसे खाल्ले, यासारखे दुर्दैव नाही. टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा – मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

“हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार नाही”

“पंतप्रधान मोदी ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते, तो महाराजांचा पुतळा कोसळला आहे. आठ महिन्यात छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था झाली आहे. यासारखे दुर्दैव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून वाटचाल करणारे हे सरकार नाहीच, हे आता सिद्ध झाले आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे. हे आम्ही का म्हणतोय हे आज महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे”, असेही ते म्हणाले.

“महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी”

“या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, महाराजांची अवहेलना करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं, संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत, महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा – Vijay Wadettivar : “सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे आता…”; बदलापूर प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं होतं पुतळ्याचे लोकार्पण

दरम्यान, गेल्या वर्षी नौदल दिनानिमित्त मालवण येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. तसेच ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह अनेकांनी या पुतळ्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच या कामाच्या चौकशीची मागणी केली होती.