विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डॉल्बीच्या दणदणाटाने साताऱ्यात वाडा कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मूत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. या अपघाताबाबत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून, या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक सोमवारी दुपारी चार वाजता सुरू झाली.  शहरातील राजपथावरून जाणाऱ्या या मिरवणुकीत अनेक मंडळांनी ‘डॉल्बी’चा दणदणाट उडवून दिला होता. या दणदणाटामुळे अगोदरच धोकादायक बनलेल्या लांजेकर वाडय़ाचा काही भाग रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळला. या वाडय़ाच्या शेजारी वडापाव विक्री करणाऱ्या एका गाडय़ावर हा भाग कोसळल्याने त्या खाली वडापाव विक्रेता आणि काही ग्राहक गाडले गेले. या वेळी त्यांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी अन्य काही लोक धावले. दरम्यान, गाडलेल्यांना बाहेर काढत असतानाच या वाडय़ाचा उर्वरित सर्व भाग कोसळल्याने पुन्हा नव्याने काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही घटना घडली त्या वेळी घटनास्थळी वीजपुरवठा खंडित होता. अंधार आणि सर्वत्र सुरू असलेल्या ‘डॉल्बी’च्या दणदणाटामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत तिघांचा मूत्यू झाला तर सात जण जखमी झाले. उमाकांत गजानन कुलकर्णी (वय ५५ यादोगोपाळ पेठ ,सातारा), गजानन श्रीरंग कदम (वय ४२, बाबर कॉलनी करंजे), चंद्रकात भिवा बोले (वय ४४, रा. समर्थ मंदिर, सातारा ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.