राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्हीच दावा सांगितला आहे. ३० जूनलाच आम्ही निवडणूक आयोगात आम्ही याचिका दाखल केला आहे. आमच्या याचिकेचा निपटारा होईपर्यंत कुणीही आमच्यावर कारवाई करु शकत नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. आम्ही अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून नेमलं आहे आणि त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी घेतलेली बैठक हीच अनधिकृत ठरवली आहे.

काय म्हटलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी?

आमचे निर्णय अधिकृत आहेत. शरद पवार गटाचे निर्णय अधिकृत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसंच आमच्या पक्षात अनेक वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या पक्षीय बांधणीत नियमांची पायमल्ली झाली आहे. अजित पवार हेच आमचे नेते आहेत हे आम्ही विधानसभा अध्यक्षांनाही कळवलं आहे. नव्या नियुक्त्यांसाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज दिले आहेत. दिल्लीत पार पडलेली बैठक अधिकृत नाही असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- NCP Split :’अजित पवार गटाकडे किती आमदारांचं बळ?’ प्रफुल्ल पटेल थेट संख्या सांगत म्हणाले…

महाराष्ट्रात नऊ आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याला काही अर्थ नाही. राजकीय पक्ष कोण? हे निवडणूक आयोग ठरवू शकतो. आमच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या कारवाईला काहीही अर्थ नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसंच मूळ राष्ट्रवादी पक्ष आम्हीच आहोत कारण आमच्याकडे आमदारांचं जास्त बळ आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. ३० तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. निवडणूक आयोग आता त्यावर निर्णय घेणार आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.