अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने करोनच्या लढाईत विजय मिळवल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  तसंच करोनासोबतचीच नाही त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

सध्या देशभरात प्रश्न आ वासून उभा आहे तो कामगारांचा. त्यांची काळजी सामाजिक संस्था घेत आहेत. राज्य सरकारंही काळजी घेत आहेत असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. त्याबाबत विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, “उद्वव ठाकरे यांनी केलेल्या मागणीचा सन्मान आहे. मात्र हे योग्य होणार नाही असं माझं व्यक्तीगत मत आहे. मात्र स्थलांतरित मजूर गावी गेले तर काम काय करणार? तिथे त्यांचं घर असेल त्यामुळे राहण्याचा प्रश्न येणार नाही. मात्र रोजचं पोट कसं भरणार? त्यामुळे या मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे ” असंही मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.  भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळे मिळून आर्थिक संकटही परतवून लावू असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

“महाराष्ट्रातली परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे केंद्राने सर्वाधिक मदत महाराष्ट्राला केली आहे. सध्याची वेळ ही कोणतंही राजकारण करण्याची नाही. राजकारणापेक्षा विकासकारण आणि राष्ट्रकारण महत्त्वाचं आहे असंही मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. सगळ्या पक्षाच्या संवेदनशील नेत्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. चुका होतात.. त्यावरुन वाद घालण्यात काहीही अर्थ नाही” असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. देश संकटात असताना आम्ही सगळे एक आहोत ही भावना अत्यंत महत्त्वाची असंही ते म्हणाले.