राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य महाराष्ट्रात रंगले होते. २ मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होते. त्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. तसेच कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. त्यानंतर ५ तारखेला शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. हा राजीनामा त्यांनी मागे का घेतला? याचे कारण आता त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले आहेत शरद पवार?

“मी राजीनामा दिला तेव्हा मला हा विश्वास होता की, मी माझ्या सहकाऱ्यांची समजूत काढू शकेन. मात्र मी ते करू शकलो नाही. मी राजीनामा दिला कारण मी स्वतःच त्याविषयी गंभीर होतो. मी राजीनामा दिल्यानंतर पुढच्याच दिवशी काय करायचे आहे हे माझ्या डोक्यात तयार होते. कारण पुढच्याच दिवशी मी पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करणार होतो,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मी माझ्या सहकाऱ्यांना समजावू शकलो नाही

“मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण मी माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालू शकलो नाही. मी जाणीवपूर्वक कुणालाही कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण मला हे वाटले होते की, मी सगळ्यांना माझा निर्णय समजावू शकेन, पण तसे घडले नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९९ मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसमध्ये बंड केले होते. आपले बंड देश पातळीवर यशस्वी होईल असे त्यांना वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. ज्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात या पक्षाने आपली किमया दाखवली आहे. याच पक्षाचे अध्यक्षपद शरद पवारांनी जेव्हा सोडले तेव्हा राज्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच शरद पवारच आमचे अध्यक्ष असतील असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी हेदेखील शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यानंतर ५ मे रोजी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. आपण राजीनामा नेमका का मागे घेतला? याचे कारण शरद पवार यांनी NDTVशी बोलताना सांगितले आहे.