महाड येथील सावित्री नदीत मगरींचा अधिवास धोक्यात आला आहे. महाडच्या पूर समस्या निवारणासाठी नदीतील गाळीच बेटे काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम मगरींच्या मुळावर येण्याची भीती पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केली जाते आहे, त्यामुळे नदीतील गाळाची बेटे काढू नका अशी मागणी त्यांनी केली महाड तालुक्यातील सावित्री नदीत मार्श क्रोकोडाईल प्रजातींच्या मगरी मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रकारच्या मगरी या प्रामुख्याने गोड्या आणि कमी क्षारता असलेल्या खाऱ्या पाण्यात वास्तव्य करतात. महाड केंबुर्ली ते दासगावच्या खाडी पट्ट्यात या मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आढळतो. नदीतील गाळाने तयार झालेली नैसर्गिक बेटांवर या मगरींचा प्रामुख्याने अधिवास आढळतो. त्यांची घरटी, अंडी, आणि पिल्ले याच बेटांवर अथवा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर आढळतात. दरवर्षी महाड येथील सिस्केप संस्थेकडून मगरींची गणना केली जाते. यात यापरीसरात १०० हून अधिक मगरींचा अधिवास असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. आता शासनाने महाडच्या पूरसमस्या निवारणासाठी मगरींचा अधिवास असलेली ही गाळाची बेटे काढण्याचा निर्णय घेतला आहे. मगरींचे अस्तित्व धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेऊन ही बेटे काढण्यास पर्यावरण विभागाने मंजूरी दिली आहे. मात्र पर्यावरण प्रेमी आणि वन्यजीव संघटनांनी नदी पात्रातील गाळाची बेटे काढण्यास विरोध दर्शविला आहे. गाळाची बेटे काढण्यामुळे मगरींचा अधिवास धोक्यात येईल अशी भिती सिस्केप या संस्थेनी व्यक्त केली आहे. मगरी या शेड्यूल १ मधील वन्यजीव प्रकारात येतात. ज्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असते. कोकणात फक्त महाड येथील सावित्री नदी आणि चिपळूण येथील वशिष्टी नदीत या मगरीचे अस्तित्व आढळते. वैदीक काळांपासून या परिसरात मगरींचे अस्तित्व असल्याचे दाखले असल्याचे अभ्यासक सांगतात. या मगरी मानवांवर सहसा हल्ले करत नाहीत. पूराच्या काळात त्या बरेचदा मानवी वस्तीत शिरल्याचे दिसून येत. पण त्यांनी कधीही मानवाला इजा केलेली नाही. सिस्केपच्या माध्यमातून मानवी वस्तीत शिरलेल्या ८४ मगरींची आत्ता पर्यंत सुटका करण्यात आली आहे. गाळाची बेटे का महत्वाची महाड येथील सावित्री नदीतील गाळाची बेटं ही मगरींच्या अधिवासाची मुख्य केंद्र आहेत. बेटांजवळील दलदल आणि पाण्यातील क्षारता मगरींसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ही बेटं मगरींच्या प्रजननाचे मुख्य ठिकाण आहेत. मे आणि जून महिन्यात मगरी या परीसरात घरटी तयार करतात आणि अंडी घालत असतात. या परीसरातील बेडूक, मासे खाऊन मगरीच्या पिल्लांची वाढ होत असते. त्यामुळे मगरी सहसा मानवी वस्ती असलेल्या किनाऱ्याकडे येत नाहीत. ही गाळाने भरलेली बेट काढली तर मगरी प्रजननासाठी मानवी असेलेल्या किनाऱ्याकडे येतील यातून मानव आणि मगर यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकेल अशी भिती वन्यजीव रक्षकांना वाटते आहे. त्यामुळे गाळाच्या बेटांचे संवर्धन गरजेचे आहे. "सावित्री नदीतील गाळाची बेटं ही मगरींचा नैसर्गिक अधिवासक्षेत्र आहेत. या बेटांवर मानवाची फारशी वर्दळ तीथे नसल्याने मगरीं आणि स्थलांतरीत पक्षांसाठी ते सुरक्षित ठिकाण आहे. ही बेट काढली तर त्याचे गंभीर दिसून येतील मगर आणि मानवात संघर्ष निर्माण होईल. मगरी मानवी वस्तीकडे असलेल्या किनाऱ्याकडे येतील. हा धोका लक्षात घ्यायला हवा," असे महाड सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मिस्त्री यांनी म्हटले