‘गण्या फू र र र’ असे कर्कश ओरडत.. त्या आजी घुमू लागल्या की हे नव्याने पाहणारा महिला वर्ग आणि छोटय़ा पोरीबाळींची घाबरून अशी पळापळ व्हायची की विचारता सोय नाही. खरे तर आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे गौरी जागवायला आणि खेळायला जायचो! अन् दरवर्षीच त्या प्रकाराला घाबरायचोही आणि एक प्रकारची गंमतही वाटायची.. काही तरी वेगळे बघितल्याची. मग देवी अंगात येणाऱ्या या आजी प्रत्येकीचे गाऱ्हाणे ऐकून त्यावर तोडगा सांगायच्या. गर्भवतीच्या किंवा जिला पाठोपाठ मुलीच होतात, अशा बाईच्या ओटय़ात गणोबा घातला की मुलगाच होतो; अशी तेव्हा ठाम समजूत होती. रिंगण, झिम्मा, फुगडी, लाटय़ाबाई लाटय़ा, काटवट काना.. कुणी सुप नाचवतंय.. तर कुणी घागर.. कुणी परात वाजवत गौरीचे कान फुंकतंय! आतेबहीण हे सारे बघायची, तिथला सावळा गोंधळ टिपायची आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येकीची नक्कल करून दाखवायची. मग आम्ही खो खो हसत सुटायचो.

मोठे होत गेलो अन् शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलला राहायला गेले. हे सारे मागे सुटलेच. जवळजवळ वीस वर्षांनी लाडक्या लेकीने हट्टच धरला की गौरी कशा जागवतात आणि काय खेळतात तिला पाहायचेच आहे. तिच्याच एका मैत्रिणीच्या आजोळी आम्ही जागरणाला गेलो आणि वीस वर्षांपूर्वीचे ते सारे क्षण डोळ्यासमोर तरळले.. आमचे आजोबा भयंकर कडक आणि रागीट. घरातल्या बायका पोरींसाठी कमालीचे कडक नियम. त्यामुळे गल्लीतल्या त्या घरी एका रात्री खेळायला जावे म्हणून आजीला त्यांची किती तरी दिवस मनधरणी करावी लागायची. वीस वर्षे कमी काळ नाही पण अगदी काल घडल्यासारखे का बरे आठवत असेल हे?

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
worlds clearest water
काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

मुलीच्या हट्टाखातर गौरीची गाणी म्हणून.. मनसोक्त दंगा करून रात्री एक दीड वाजता स्वत: ड्राइव्ह करून घरी परत येताना.. गेल्या वीस वर्षांतील अनेक प्रसंग आठवले. लहानपणी जिथे स्वत:च्या एक-दोन तासांवरही हक्क नव्हता, प्रेमापोटी असेल; सुरक्षिततेसाठी असेल, घरच्या आणि गावच्या कर्मठ वातावरणामुळे असेल; हे स्वातंत्र्य नव्हतेच. जगण्याच्या चौकटी बदलल्या! शिक्षण असेल; व्यवसाय असेल किंवा बदललेले जगण्याचे संदर्भ असतील! कुठून कुठे आलो आहोत आपण.. आणि कुठे चाललो आहोत? बदल हा नियम असला तरी.. बाहेरच्या बदलांबरोबर आतही क्षणाक्षणाला बदलणे अखंड चालू आहे याची जाणीव कधी आश्वस्त करणारी असते, तर कधी अस्वस्थ करणारी. दोन टोकांवरचं जगणं.. विचारांचा लंबक काही केल्या स्थिर होत नाही..

गेल्या काही दिवसांत.. नोटाबंदीनंतरची अनागोंदी, पडद्यावर आणि पडद्याआड होणारे वाद, निराशाग्रस्त लेकरांची आत्महत्या, लिंगपिसाट बाबावरची कारवाई, मुसळधार पावसाने दाखवलेली ताकद, पावसामुळे मानवी वर्तनाचा माणसालाच बसलेला फटका आणि कुठे इमारत कोसळून किडय़ा मुंगीप्रमाणे जाणारे जीव.. मेंदू सगळे टिपत राहतो. आत कुठे तरी प्रत्येक घटनेचा पडसाद उमटतो. सामान्य आहोत आपण, आपल्याच जगण्याच्या परिघावर उभे राहून आपण बघे म्हणून हे बघत राहायचे! करायचे काहीच नाही किंवा काय करायचे ते समजत नाही!

हताशपणा दाटून आला की मला संदीप खरेंची एक कविता नेहमी आठवते.

कशी ही अवस्था कुणाला कळावे?

कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?

किती खोल जातो तरी तोल जातो..

असा तोल जाता कुणी सावरावे?

अताशा असे हे मला काय होते?

कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते!

बरा बोलता बोलता स्तब्ध होतो

कशी शांतता शून्य शब्दात येते!

परत कानात ‘गण्या फू र र र’ ची आर्त किंकाळी घुमल्याचा भास.. की स्वत:च तेवढय़ा आर्तपणे ओरडावे असे वाटते. तो आवाज तसाच दाबते. कारण पांघरलेल्या झुलीमुळे असे ‘हिस्टेरिक’ होण्याची परवानगी स्वत:ला देता येत नाही. असे केल्याने किंवा झाल्यानंतर भोवताल बदलणार नसतोच. आपल्या आतील वादळे.. बाहेरच्या कोलाहलातही आपणच शमवायची हे शहाणपण किंवा काही अंशी कोडगेपण आलेच आहे.. ते घट्ट लपेटून घ्यायचे.

बघताबघता विसर्जनाची धामधूम चालू होते.. डॉल्बीचा छाती दडपणारा आवाज आतले कान बंद करून क्षीण करायचा केविलवाणा प्रयत्न करायचा! तो होत नाहीच! तरी तो आवाज बंद करा म्हणून ओरडायचे नाही.. सारे आवाज रिचवत जेव्हा आडमार्गाच्या एखाद्या इमारतीत शांतपणे इको फ्रेंडली बाप्पाला बादलीतच निरोप दिला जात असतो.. तेव्हा आपसूकच शांत वाटते.. भवताली कितीही गदारोळ असला तरी.. सामान्य माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपल्यात उमटणाऱ्या साऱ्या वावटळींचे प्राक्तन हे असेच बंदिस्तपणे विसर्जित करायचे.. त्यालाही बळ जमवावे लागतेच. सगळे खूप वाईट चालले आहे असे नाहीच! काही चांगले विधायक होत आहे यावर विश्वास ठेवायचा! आपल्याला नंदनवन फुलवता आले नाही तरी.. निसर्गत:च जी झाडे भोवताली दिसत आहेत.. किमान ती तरी जपायचा प्रयत्न करायचा! अजून तरी चांगल्या वाटेवर चालत राहण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.. निदान तो पर्याय दिसत आहे तोवर त्यावर प्रामाणिकपणे चालत राहायचे.. सुरुवात स्वत:पासून.. स्वत:ला समजेल.. उमजेल.. अशी सजगपणे करायची..

सार्त् म्हणतो, ‘‘त्या त्या काळात होणाऱ्या युद्धालासुद्धा आपण जबाबदार असतो!’’ नक्कीच असतो. युद्ध आतले, बाहेरचे, कुंपणा अलीकडचे, कुंपणा पल्याडचे ..संपूर्णपणे थांबून.. सुराज्य येईल.. हा भाबडेपणा असेल कदाचित.. पण भाबडय़ा स्वप्नांचे पाईक होऊन प्रयत्न करायला काहीच हरकत नसेल, जोपर्यंत स्वत:च्या आतील अनागोंदी मला यशस्वीपणे हाताळता येणार नाही.. तोपर्यंत बाहेरच्या कोलाहलाला समर्थ टक्कर देण्याचे बळ कुठून आणि कसे येईल? आव्हाने सगळ्या काळात होती. राहतीलच.. कोणत्या तरी रूपात! त्यांना भिडायचे तर सशक्त होणे. हाच एकमेव ‘पर्याय’!

शांताबाई शेळके म्हणतात;

वाटते, तितके नसतो आपणही एकाकी, निराधार

नसते केवळ आपल्यापुरते आपले हताशपण

म्हणून तर पुढय़ातल्या काळ्याकरडय़ा राखेतूनही

अवचित झगमगून उठतात इवले इवले अंगारकण

हे तर खरेच, की तेवढय़ाने काळोख नसतो

उजळत  पण कुणी तरी, कुठे तरी

आपल्यासाठी असते फुलत जळत!

 

सोनाली वाळवेकर-शेटे

sonujanukevu@gmail.com