छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. अलिकडेच या मालिकेने २५० भागांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण टीमने हटके पद्धतीने या खास दिवसाचं सेलिब्रेशन केलं. इतकंच नाही तर सगळ्या टीमने त्यांच्या एक दिवसाचं मानधनदेखील एका संस्थेला भेट म्हणून दिलं आहे.

मालिकेने २५० भागांचा टप्पा गाठल्यामुळे या संपूर्ण टीमने पुण्याजवळील ‘आपलं घर’ या संस्थेला भेट दिली.विशेष म्हणजे त्यांनी केवळ भेटच दिली नाही. तर त्यांचं एक दिवसाचं मानधनदेखील या संस्थेला दिलं आहे. ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुले आणि वृद्धांची काळजी घेत आहेत.

‘आपलं घर ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करत आहे. अनेक कलाकारदेखील या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहित होत. त्यामुळेच ‘आई कुठे काय करते’च्या २५० भागांचं सेलिब्रेशन आम्ही आपलं घर मधील या खास परिवारासोबत करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण टीमने अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं,’ असं दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले.